
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरण दृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या भागातून शक्तीपीठ महामार्ग देण्याचा घाट शासन घालत असताना या भागाचे सत्ताधारी पक्षाचे आमदार दीपक केसरकर गप्प का ? असा सवाल कॉम्रेड संपत देसाई यांनी केला. तब्बल 12 जिल्ह्यातील 27 हजार एकर जमिनीतून होऊ घातलेल्या या महामार्गाला शक्तिपीठ हे धार्मिक नाव देऊन श्रद्धेच्या नावाखाली बाजार मांडून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव शासनाने आला आहे. मात्र आमचे रक्त सांडले तरी हा महामार्ग कदापी होऊ देणार नाही. त्यासाठी 12 मार्च रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर पुकारलेल्या आंदोलनामध्ये कोकणातील पर्यावरण प्रेमी शेतकरी व जनतेने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी सहकारी कॉम्रेड शिवाजीराव मगदूम, कॉम्रेड सम्राट मोरे,कॉम्रेड मच्छिंद्र मुगडे,कॉम्रेड राजेंद्र कांबळे, शब्बीर मणियार, राजश्री भगत, सिंथिया राॅड्रिक्स, प्रबोधिनी देसाई आदी उपस्थित होते. कॉम्रेड श्री देसाई पुढे म्हणाले, गेली वर्षभर आम्ही शक्तिपीठ महामार्गाच्या विषयाला हात घालून जनजागृती व विरुद्ध दर्शवण्याचे काम करत आहोत एकूण बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाला 27 हजार एकर जमीन जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजऱ्यातून सिंधुदुर्गात हा महामार्ग प्रवेश करणार आहे मुळात माधव गाडगीळ समिती कस्तुरी रंगात समिती यांच्या अहवालानंतर पर्यावरण दृष्ट्या अति संवेदनशील म्हणून घोषित झालेल्या शिवाय ज्या भागात पट्टेरी वाघाचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे. त्या भागातून हा मार्ग जात आहे. त्यामुळे येथील जैवविविधता पशुपक्षी नामशेष होणार आहे. मुळात अनेक पर्यायी महामार्ग असताना हा महामार्ग केवळ आणि केवळ ठेकेदार आणि त्यासाठी खर्च होणाऱ्या 86 हजार कोटीच्या कमिशन वर डोळा ठेवून रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ते पुढे म्हणाले, सद्यस्थितीत या महामार्गाच्या बाजूने बैठका घेऊन शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम शासनाचे दलाल करत आहेत. ज्यांची एक इंच ही जागा या महामार्गामध्ये जात नाही ते लोक शेतकऱ्यांचे बुद्धिभेद करत आहेत मुळात हा महामार्ग शेतकऱ्यांसाठी नाहीच आहे. एखाद्याचा डोळा फोडून त्याला चष्मा दान करायचा असला हा भाग आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथील एका सभेत महामार्गाला शेतकऱ्यांना नको असल्यास हा महामार्ग होणार नसल्याचे सांगत दुसऱ्या दिवशी महामार्ग रद्दची अधिसूचना काढली होती. परंतु हा केवळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार होता. आज कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांनी या महामार्गाला विरोध दर्शवला आहे. परंतु अधिवेशन काळात यावर कोणीच आवाज उठवताना दिसत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मतदारसंघातील अति संवेदनशील भागातून हा रस्ता जात असताना सत्ताधारी पक्षाचे आमदार केसरकर हे सुद्धा यावर काही बोलत नाही. त्यांनी शक्तिपीठ बाबत तोंड उघडावे व आपली भूमिका स्पष्ट करावी.
आम्ही विकासाच्या अजिबात आड येत नाही परंतु जो विकास शेतकऱ्यांच्या हिताचाच नाही तो विकास काय कामाचा विकास हा शाश्वत असावा शक्तिपीठ सारख्या महामार्गाच्या नावाखाली विकास दाखवून केवळ इंटरेस्टिंग आणि भांडवलदारांचे हित जपण्याचे काम आणि त्यातून स्वतः मलिदा लुटण्याचे काम शासन करत आहे त्यामुळे आमचा या महामार्गाला विरोध आहे. त्यामुळे आमचे रक्त सांडले तरी हा रस्ता आम्ही होऊ देणार नाही.