वृत्तसंस्था, नवी दिल्ली: भारतात शेतकऱ्यांनी सध्याच्या वेगाने भूजलाचा उपसा करणे सुरू ठेवले, तर २०८०पर्यंत देशातील भूजल साठा खालावण्याचा वेग सध्याच्या तिपटीवर जाईल, त्यामुळे देशाची अन्नसुरक्षा तसेच जलसुरक्षा यांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा एका ताज्या संशोधनात देण्यात आला आहे.
अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. जागतिक तापमानवाढीमुळे भारतातील शेतकऱ्यांनी जलसिंचनासाठी भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. परिणामी, जलसाठा घटल्याने देशाच्या १.४ अब्ज लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकसंख्येची उपजीविका धोक्यात येईल आणि त्याचे जागतिक पातळीवरही भीषण परिणाम होतील, असा इशारा ‘सायन्स अॅडव्हान्सेस’ या विज्ञानपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या संशोधनात देण्यात आला आहे.