
सावंतवाडी : संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विधवा, अंध, अपंग आणि ६५ वर्षांवरील वृद्ध व्यक्तींनी आपले मानधन नियमित सुरू राहण्यासाठी एप्रिल ते जून या कालावधीत 'हयातीचा दाखला' सादर करणे अनिवार्य आहे. हा दाखला वेळेत जमा न केल्यास शासनाकडून मिळणारी पेन्शन बंद होऊ शकते, असे आवाहन जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी केले आहे.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांतर्गत गरजू लाभार्थ्यांना दरमहा ठराविक मानधन दिले जाते. मात्र, हे लाभार्थी हयात आहेत की नाही, याची खातरजमा करण्यासाठी दरवर्षी प्रशासकीय स्तरावर हयातीचा दाखला मागवला जातो. लाभार्थ्यांनी संबंधित बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपली स्वाक्षरी किंवा अंगठा देऊन हयातीची नोंद करावी. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आणि आपले आर्थिक मानधन वेळेत मिळण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी या आवाहनाची दखल घेऊन त्वरित हयातीचा दाखला सादर करावा, असे मसूरकर यांनी स्पष्ट केले आहे.










