'सिंधुरत्न' योजनेला मुदतवाढ | केसरकरांनी केली होती मागणी

केसरकरांनी मानले मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार
Edited by: विनायाक गांवस
Published on: March 06, 2026 19:55 PM
views 92  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेली महत्त्वाकांक्षी सिंधुरत्न समृद्ध योजनेची तीन वर्षाची मुदत मार्च 2025 ला संपली होती. या योजनेला मुदतवाढ देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेत मागणी केली होती.

आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात सिंधूरत्न समृद्ध योजना 2.0 पुढील तीन वर्षासाठी राबविण्यात येणार असल्याचे घोषित करून मुदतवाढ दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आभार मानले आहेत. कोकणच्या विकासासाठी ही योजना महत्वपूर्ण अशी असून यामुळे येथील शेतकरी, महिला व युवकांना याचा लाभ झाला होता. योजनेची तीन वर्षाची मुदत मार्च 2025 ला संपली होती. या योजनेला मुदतवाढ देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेत मागणी केली होती. मागणी पूर्ण केल्यानंतर आज श्री. केसरकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानले आहेत.

राज्याच्या आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात “सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0” पुढील तीन वर्षांसाठी राबविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली असून या योजनेला अधिकृत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला नवे बळ मिळणार असून विविध पायाभूत सुविधा, पर्यटन, शेती व मत्स्य व्यवसाय क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास दीपक केसरकर यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत श्री. केसरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचेही सहकार्याबद्दल त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 च्या माध्यमातून कोकणातील दोन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल आणि स्थानिक नागरिकांच्या प्रगतीसाठी नवे मार्ग खुले होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.