
सावंतवाडी : शहरातील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या महावितरणच्या पोलवर स्पार्कींग होऊन बराचवेळ आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. येथील नागरिकांना महावितरणला कळवताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. मात्र, यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महावितरणच्या कारभारामुळे शहरासह तालुक्यात हकनाक जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात आज येथीर आरपीडी रोड परिसरातील पोलवर स्पार्कींग होऊन बराचवेळ आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. १० मिनिटांहून अधिक वेळ हा प्रकार सुरू असताना पोल खालून नागरिकांची येजाही सुरू होती. बघ्यांच्या गर्दीमुळे काहीजण सावध होऊन माघारी परतले. मात्र, यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रहदारीचा व मुख्य रस्ता असून या ठिकाणी शाळा, कॉलेजसह बाजारपेठ आहे. त्यामुळे मोठी हानी पोहोचू शकते. हा प्रकार बघता तसेच शहरात तालुक्यात गेलेले हकनाक बळी बघता शहरात भुमिगत वीज वाहिन्यांचा पर्याय तातडीने उपलब्ध व्हावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.










