
सावंतवाडी : 'जनता आरोग्य दरबारा'तील जनभावना आणि समस्यांचे इतिवृत्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या समोर ठेवण्यात येईल, तसेच आमदार दीपक केसरकर यांनाही यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली जाईल अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली. रुग्ण जगला पाहिजे यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, शासनस्तरावर वैद्यकीय पदभरती सुरू असल्याने लवकरच पुरेसे एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित बैठकीत खेबुडकर बोलत होते.
यावेळी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांनी सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत केले. बैठकीत जनता आरोग्य दरबाराचे समन्वयक एन. बी. रेडकर यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोग्य दरबारासाठी सर्व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देऊनही अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. लोकांच्या प्रश्नांवर प्रशासनाने संवेदनशील असायला हवे होते. मात्र, अधिकारी ढिम्म राहिले, असा आरोप रेडकर यांनी केला. विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे काढले. उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरल्याचे दाखवले जाते, परंतु प्रत्यक्षात कर्मचारी हजर नाहीत असं रविंद्र ओगले यांनी सांगितले.
संजय पिळणकर म्हणाले, सावंतवाडी रक्तपेढीचा परवाना प्रलंबित असून रक्तदान व देहदान करणाऱ्यांबाबत प्रशासन अनास्था दाखवत आहे. गुणेश गवस यांनी बांदा आरोग्य केंद्रात सुसज्ज रुग्णवाहिका द्यावी, सावंतवाडीत 'महा डायलिसिस युनिट' सुरू करावे असे सूर्या पालव यांनी सुचविले आणि जिल्ह्याला ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण करावे असे प्रा. सुभाष गोवेकर यांनी सांगितले.
"महात्मा फुले योजनेतून निधी देऊनही गोवा बांबुळी रुग्णालयात सिंधुदुर्गातील रुग्णांना हिणवले जाते. याप्रकरणी गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांसोबत तातडीने बैठक घ्यावी," अशी मागणीही यावेळी करण्यात आली. नागरिकांना कोल्हापूर, बेळगाव किंवा गोव्याला जावे लागू नये, अशी यंत्रणा जिल्ह्यातच हवी, असा सूर यावेळी उमटला. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, आरोग्य सभापती सुधीर आरीवडेकर, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, कार्यकारी अभियंता पूजा इंगवले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, बीडीओ वासुदेव नाईक यांसह एन. बी. रेडकर, प्रा. सुभाष गोवेकर, रवींद्र ओगले, संजय पिळणकर,रवी जाधव, यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले.










