‌..तर न. प. प्रशासन हवं कशासाठी ?

ठेकेदारासह स्व-भल्यासाठी ?
Edited by: विनायक गांवस
Published on: September 08, 2025 11:57 AM
views 261  views

सावंतवाडी : आठ दिवसांपूर्वी सावंतवाडी नगरपरिषदेला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी आवाहन केले होते. मात्र, कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वखर्चाने ते खड्डे बुजविण्याच काम केलं. वर्ष-दोन वर्ष सुद्धा जर रस्ते टीकत नसतील, खड्डे पडल्यास त्याची डागडुजी न.प. प्रशासन करत नसेल तर ठेकेदारासह स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठीच नगरपरिषद हवी का ? असा संतप्त सवाल शहरवासीयांतून केला जात आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष वेधूनही ऐन गणेशोत्सवात पडलेले हे खड्डे तसेच होते‌. गेल्या आठ दिवसात सावंतवाडी बाजारपेठ व आरपीडी हायस्कूल रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नाही. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाने खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार असा इशाराही दिला होता. परंतु, नगरपरिषदेकडून कुठच्याही प्रकारचा योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे तसेच गणेश चतुर्थीच्या सुट्ट्या संपून शाळा - महाविद्यालये सुरू झाल्याने या खड्ड्यांनमुळे वाहन चालकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना अडथळा होऊ नये, अपघात होऊ नये यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पहाटे चार वाजेपर्यंत हे खड्डे बुजवण्यात आले. खड्डे बुजवण्यासाठी भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक बबन डिसोजा यांनी खडी व वाळू पुरवली तसेच सिमेंट व लेबरचार्ज सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी यासाठी खर्च केला. भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते बबन डिसोजा यांनी पावसापूर्वी  स्वखर्चाने भटवाडी येथील रस्त्याच्या बाजूला  धोकादायक व जीर्ण झालेली झाडे स्वखर्चाने तोडून घेतली होती. त्यांचे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला मोठे योगदान आहे.

या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते बबन डिसोजा, राज्य माहिती आयोग अधिकारी सुशील चौगुले व बांधकाम व्यवसायिक दादा नगनूर तसेच त्यांचे कामगार समीर यांचे मोठे सहकार्य लाभले. रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. तसेच कर घेऊन देखील ही काम जर सामाजिक कार्यकर्त्यांनी करायची तर न.प. प्रशासन अन् ठेकेदार फक्त मलिदा खाण्यासाठी हवेत का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.