
सावंतवाडी : सावंतवाडीतील वीज समस्या सुटायच नाव घेत नाहीत. सोमवारी या समस्यांच निराकरण करण्यासाठी ६ तास विद्युत प्रवाह खंडित केल्यानंतरही ग्राहकांच्या पदरी निराशेचा सप्लाय पडला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींकडून घेण्यात येणाऱ्या बैठकांत अधिकारी वर्ग त्यांची केवळ दिशाभूल करत असल्याचा आरोप वीज ग्राहक करत आहेत.
ऐन उन्हाळ्यात मे महिन्यापासून सुरू झालेल्या या समस्या जून संपला तरी सुरूच आहे. सतत विद्युत पुरवठा खंडित होत आहे. पालकमंत्री, आमदार यांच्याकडून बैठकांत सुचना दिल्यानंतरही या समस्या काही सूटत नाही आहेत. महावितरणचे अधिकारी लोकप्रतिनिधींची दिशाभूल करत असल्यानेच हे प्रकार होत असल्या आरोप वीज ग्राहकांनी केला आहे.
शहरासह तालुक्यात आजही अनेक ठिकाणी ११ केव्ही विद्युत भारीत लाईनवर झाडांच्या फांद्या दिसत आहेत. पावसाळ्यापुर्वी त्या हटवण आवश्यक होत. मात्र, ते झालेलं नाही. विद्युत पोल तळाला गंजून गेले आहेत. यामुळे अपघातांची शक्यता आहे. तसेच इन्सुलेटरसह इतर विद्यूत यंत्रणा ही जीर्ण झालेली आहे. गेली अनेक वर्षे ती बदलली गेलेली नाही. कामचलावू कारभार होत असल्याने आजवर कंत्राटी वीज कर्मचारी, सामान्य नागरिक अन् मुक्या जनावरांचे हकनाक बळी पडले आहेत. मात्र, बैठकांमध्ये महावितरण अधिकारी लोकप्रतिनिधींची दिशाभूल करत असल्याचे दिसत आहे. मुख्य गोष्टीबाबत ठोस उपाययोजना होताना दिसत नाही आहे. त्यामुळेच आजही वीजेचा लपंडाव सतत सुरू आहे. जुलै, ऑगस्ट महिने पावसाळ्याचे आहेत. त्यात गणेशोत्सव व इतर सण आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास ग्रामीण भागात देखील मोठा फटका उत्सव काळात बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी वीज ग्राहक करत आहेत.