
सावंतवाडी : उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांची सिरोंचा - गडचिरोली येथे बदली झाली असून त्यांच्या जागी गडचिरोली येथे उपवनसंरक्षक म्हणून कार्यरत असलेले मिलिश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रेड्डी यांची तीन वर्षांच्या कार्यकाळानंतर त्यांच्या मूळ गावी बदली झाली आहे.
नवीन उपवनसंरक्षक म्हणून रुजू झालेले मिलिश शर्मा हे २०१८ मध्ये वनविभागात रुजू झाले आहेत. सावंतवाडी, दोडामार्ग परिसरात हत्ती आणि इतर वन्यप्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढलेला असताना त्यांची ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः दोडामार्गवासीय हत्ती हटाव मोहीम राबवण्याबाबत आग्रही आहेत. नुकतीच या मोहिमेसंदर्भात एक बैठक झाली होती, परंतु त्यातून कोणताही ठोस निर्णय अद्याप निघालेला नाही. अशा परिस्थितीत शर्मा यांना या गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर, आमदार दीपक केसरकर यांनी यापूर्वी मुख्य वनसंरक्षक रामानुजम यांच्यावर निष्क्रिय अधिकारी असल्याचा आरोप केला होता. हत्ती हटाव मोहिमेतील त्यांच्या अपयशामुळे जनतेमध्ये सरकारविरोधात रोष निर्माण झाल्याचे केसरकर यांनी म्हटले होते. त्यामुळे निष्क्रिय अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली होती. जून अखेरीस महाराष्ट्रातील प्रमुख वन अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. या बदल्यांमध्ये कोल्हापूरच्या मुख्य वनसंरक्षकांची बदली चंद्रपूर येथे करण्यात आली आहे, परंतु त्यांच्या जागी अद्याप नवीन मुख्य वनसंरक्षकांची नियुक्ती झालेली नाही.