
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या माणगाव खोऱ्यातील अनेक गावांमध्ये पंधरा पंधरा दिवस वीज गायब असल्याच्या तक्रारी वीज ग्राहक संघटनेकडे येत होत्या. कुडाळ येथील अधीक्षक अभियंता यांच्या भेटीदरम्यान सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या शिवापूर गावच्या महिला सरपंच सौ. शेडगे यांनी कुडाळ येथे येऊन आपल्या गावाची व्यथा मांडली होती. त्यावेळी कार्यकारी अभियंता वनमोरे यांनी अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्या सूचनेनुसार बुधवारी शिवापूर येथे दुपारी तीन वाजता येऊन ग्रामस्थांसोबत बैठक घेण्याचे कबूल केले होते. ठरल्याप्रमाणे वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग चे अध्यक्ष संजय लाड व कार्यकारी अभियंता वनमोरे, उपकार्यकारी अभियंता महेश निळकंठ, सहाय्यक अभियंता रामचंद्र शेळके आदींनी शिवापूर येथे ग्रामपंचायत मध्ये वीज ग्राहकांसोबत बैठक घेतली. यावेळी शिवापुर सरपंच सौ.सुनीता शेडगे, उपसरपंच महेंद्र राऊळ, वसोली सरपंच अजित परब, सुधीर गुंजाळ, गौरी गुंजाळ, हर्षा मेस्त्री आदी उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान शिवापुर सरपंच सौ सुनिता शेडगेंसह वीज ग्राहकांनी माणगाव खोऱ्यातील दुकानवाड, शिवापुर दशक्रोशी साठी स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याची मागणी प्रामुख्याने कार्यकारी अभियंता वनमोरे यांच्याकडे केली. त्याचबरोबर शिवापूर येथे येणारी मुख्य वीज वाहिनी ही जंगलमय भागातून येत असून माणगाव खोरे हे कुडाळ तालुक्यातील दुर्गम भागात वसलेले असल्यामुळे जंगलातील वीज वाहिनीला बिघाड झाल्यास पंधरा पंधरा दिवस त्याकडे अधिकारी व कर्मचारी वर्गाचा दुर्लक्ष होतो. परिणामी वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा केला जात नाही. याकरिता संपूर्ण वीज वाहिनी रस्त्याच्या कडेने वीज खांब उभे करून नव्याने घालण्यात यावी अशी ही मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी कार्यकारी अभियंता वनमोरे यांनी सबस्टेशन साठी जागा उपलब्ध करून दिल्यास तात्काळ सबस्टेशन उभारून देण्याची ग्वाही दिली. वनमोरे यांची जागेची मागणी उचलून धरत दुकानवाड येथील व्यापारी सुधीर गुंजाळ यांनी नवीन सबस्टेशन साठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. त्याचप्रमाणे रस्त्याने कडेने किती खांब लागतील याचा सर्व्हे किलोमीटर प्रमाणे स.अभियंता रामचंद्र शेळके यांनी केला असून तसा अहवाल सादर केला आहे. त्या अहवालाप्रमाणे लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल असे आश्वासन वनमोरे यांनी दिले.
या बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी तात्काळ वीज वाहिन्यांना लागत असलेली झाडी कटिंग करून देण्याची त्याचबरोबर गावातील घरांमध्ये असलेले जुनेच मीटर कायम ठेवावेत नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर लावू नयेत अशी मागणी करून नवीन स्मार्ट मीटरला विरोध असल्याचा एकमुखी ठराव घेण्यात आला. माणगाव खोरे हा भाग विस्ताराने मोठा असून संपूर्ण क्षेत्र सहाय्यक अभियंता रामचंद्र शेळके हे सांभाळतात परंतु माणगाव खोऱ्यासाठी एकच वायरमन असल्याने वीज ग्राहकांना ना त्रास होत आहे त्याकरिता माणगाव खोऱ्यात किमान दोन वायरमनची नेमणूक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.
यावेळी विकास माणगावकर, शांताराम कदम, गोपाळ कदम, अनिल बांग, सुरेश नाईक, धोंडी राऊळ, मोरारजी बांग, साईनाथ साळगावकर, सहदेव पाटकर, महादेव चव्हाण, राजाराम पालकर आदी वीज ग्राहक उपस्थित होते.