
सावंतवाडी : महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठल्याही ग्रामस्थांची,शेतकऱ्यांची, बागायतदारांची मागणी नसताना, गरज नसताना जबरदस्तीने त्यांच्यावर लादण्यात येत असलेल्या नागपूर ते पत्रादेवी द्रूतगती शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण व निसर्गप्रेमी, सर्वसामान्य नागरिक अशा सर्वांची एकजूट बैठक बुधवार २ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हाॅल येथे आयोजित केलेली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संवेदनशील निसर्ग असणाऱ्या बारा गावांतून प्रस्तावित असलेला हा शक्तीपीठ महामार्ग हा जैवविविधता, निसर्ग उध्वस्त करणारा, पिण्याच्या पाण्याचा आणि शेती बागायतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित करणारा ठरणार आहे. गेळे, आंबोली, पारपोली, नेनेवाडी, घारपी, फुकेरी, असनिये, तांबोळी, झोळंबे, डेगवे, बांदा अशा बारा गावांतून हा महामार्ग जाणार आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील निसर्ग असलेल्या जंगलातील लाखो वृक्षांची कत्तल होणार आहे. ही सह्याद्रीतील राक्षसी वृक्षतोड पर्यावरणाला घातक ठरेलच, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते. हा सर्व परिसर वन्यजीवनाने समृद्ध असून वाघाचा संचारमार्ग याच भागातून जातो.
" शक्तीपीठ महामार्गाला विरोध मोडून काढू", "विरोध करणाऱ्यांना फटके मारू" अशा उद्दाम प्रवृत्तींना शांततेच्या व लोकशाही, घटनात्मक मार्गाने विरोध दर्शविण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे. राज्यातील बाराही जिल्ह्यात या महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. सर्व ठिकाणी शेतकरी, नागरिक आक्रमकपणे, परंतु सनदशीर मार्गाने या राक्षसी प्रकल्पाला विरोध करीत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अशा प्रकारचे आंदोलन उभे रहाणे, आवश्यक आहे. यासंदर्भात विचार करुन कृतीकार्यक्रम ठरविण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीला आपण आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन, माजी आमदार वैभव नाईक, बाबूराव धुरी(जिल्हा प्रमुख, शिवसेना), इर्शाद शेख (जिल्हाध्यक्ष, काॅंग्रेस), अमित सामंत (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श.प.), डॉ जयेंद्र परुळेकर (निमंत्रक, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, सिंधुदुर्ग), सतीश लळीत (सह निमंत्रक) प्रसाद पावसकर, संदीप सावंत,असनिये यांनी केले आहे.