सावंतवाडीकरांना सरकारनं फसवलं ?

टर्मिनसचं भिजत घोंगडं ! कोनशिलेची दशकपूर्ती ; मुख्यमंत्री फडणवीस होते अध्यक्ष !
Edited by: विनायक गांवस
Published on: June 24, 2025 17:05 PM
views 185  views

सावंतवाडी : मळगाव रेल्वे स्थानक येथील ''सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन'' या कोनशिलेला येत्या २७ जून रोजी तब्बल १० वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, या दहा वर्षात हे टर्मिनस काही सावंतवाडीकरांना दिसलं नाही. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या टर्मिनसच नेमकं झालं तरी काय ? हा प्रश्न सावंतवाडीकरांना पडला आहे. त्यामुळे सावंतवाडीकरांना नेत्यांनी फसवल ? टर्मिनसच भिजत घोंगडं ! म्हणायची वेळ आली आहे. 

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोकण रेल्वे कार्पोरेशनने सावंतवाडी रेल्वे टर्मिनस भूमिपूजनाचा एव्हेंट धुमधडाक्यात साजरा केला. मात्र, मागच्या दहा वर्षात हे टर्मिनस काही सावंतवाडीकरांना दिसलं नाही. ही कोनशीला देखील मागील ९ वर्ष ११ महिने २४ दिवस धूळखात पडली आहे. नुकत्याच झालेल्या सुशोभीकरणात तर ती लपली गेली आहे. त्यामुळे सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन हा एक 'पॉलिटिकल एव्हेंट' होता की काय ? असा प्रश्न आता पडू लागला आहे. आजतागायत हे टर्मिनस पूर्ण नाही, अस्तित्वात नाही. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने याबाबत कित्येकदा आवाज उठवला. मात्र आश्वासनांशिवाय हाती काहीच आले नाही. आंदोलन, उपोषण करूनही पदरी काही पडलं नाही. केवळ बोळवण करण्याचा प्रकार केला जात आहे. त्यामुळे सावंतवाडी टर्मिनसबाबत या एव्हेंटला अध्यक्षस्थानी लाभलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस भुमिका घ्यावी व विषय मार्गी लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.