
सावंतवाडी : नविन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण अधिक व्यापक झाले असून ते मातृभाषेतून दिले जाणार आहे. इंजिनीअरिंगचे शिक्षण मराठीतून दिले जात आहे. लवकरच वैद्यकीय शिक्षण सुद्धा मातृभाषेतून देण्याची मागणी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली जाईल असे मत माजी शिक्षणमंत्री आम. दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. तसेच पुस्तकांचा बोजा कमी करण्याबाबत शिक्षणमंत्री दादा भुसे व मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. येथील शाळा प्रवेशोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ४ मध्ये आज शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यावेळी आमदार दीपक केसरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात गणवेश व पुस्तकांचे वाटपही करण्यात आले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर, केंद्र प्रमुख कमलाकर ठाकूर, डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. सुरेश माने, प्रा. गिरीधर परांजपे, माजी नगरसेविका शर्वरी धारगळकर, समृद्धी विर्नोडकर, दिपाली सावंत, शाळा शिक्षण समिती अध्यक्ष संतोष तळवणेकर, ललिता सिंग, किरण नाटेकर, नंदू शिरोडकर, समीर पालव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. केसरकर म्हणाले, पूर्वी ज्युनिअर आणि सिनियर केजी नव्हती तेव्हा थेट अक्षर ओळख करून दिली जात होती. आता नवीन शैक्षणिक धोरणात तीन स्तरांवर शिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक असे पाच वर्ग असणार आहेत. शिक्षकांच्या योगदानाला हे महत्त्व दिले आहे. जिल्हा परिषदच्या या शाळेला शेडसाठी १५ लाख रुपये व शालेय पोषण आहारासाठी ५ लाख रुपये मदत देण्याची घोषणा श्री. केसरकर यांनी केली. तसेच महायुतीनेच मिडडे मील दर्जेदार मिळावा आणि स्मार्ट टीव्ही योजना सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी व्हावे आणि शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम येण्याची परंपरा कायम ठेवावी असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डाएटचे डॉ. माने यांनी प्रस्ताविक केले. शाळेने गुणवत्तेत चांगली भर घातली आहे. शाळेची पटसंख्या पुन्हा वाढून २०० वर गेली आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. शाळेचे शिक्षक महेश म्हणाले, शाळेतील ३ विद्यार्थी नुकतेच विमानप्रवासाने इस्त्रोला भेट देऊन आले आहेत.ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे म्हणाले, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांमधून उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळते. त्यांनी स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतल्याचे सांगितले. भावी पिढीला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांचे त्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी योग्य आकार घेऊन उज्ज्वल भविष्य घडवावे असे आवाहन त्यांनी केले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, मुलांना पहिल्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी आमदार दीपक केसरकर स्वतः आले.याच शाळेत शिकलेला विद्यार्थी नगराध्यक्ष आणि इंजिनिअर होऊ शकतो. येथील शिक्षक दर्जेदार शिक्षण देतात. त्यामुळेच शाळेची पटसंख्या वाढत आहे. केसरकर यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या नाविन्यपूर्ण निर्णयांचा महाराष्ट्राला आणि शाळेला फायदा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र प्रमुख कमलाकर ठाकूर यांनी आभार मानले. या कार्यक्रमामुळे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.