
सावंतवाडी : शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पावसामुळे डासांच्या झुंडी नागरिकांच रक्त पिण्यासाठी दिवस- रात्र घोंघावत आहेत. यामुळे नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे. तसेच आजाराचा धोका वाढला आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन यावर ठोस उपाययोजना करणार का ? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
वर्षभरापूर्वी डास मुक्तीसाठी आणलेल्या फॉगिंग मशीन नेमक्या कुठे आहेत ? हा प्रश्न नागरिकांनी केला आहे. नगरपरिषदेकडून लिक्वीड स्वरुपात उपाययोजना केली जात असली तरी त्याचा परिणाम शून्य आहे. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर तात्काळ उपाययोजना करून डासांपासून रक्षण करावं अशी मागणी नागरीक करत आहेत.