तालुक्यात आजही ग्रामस्थ रस्त्याच्या प्रतीक्षेत

पूल नसल्यामुळे करावी लागते पायपीट
Edited by: विनायक गांवस
Published on: June 15, 2025 17:09 PM
views 150  views

सावंतवाडी : कुणकेरी- सरुंदेवाडी ही सावंतवाडीपासून हाकेच्या अंतरावर असणारी वाडी आहे‌. या वाडीमध्ये राहणारे नागरिक हे आजही अत्यावश्यक मूलभूत सेवांपासून वंचित असून आजही खडतर जीवन जगत आहेत. पावसाळ्याचे चार ते पाच महिने या नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून काढावे लागत आहे. निवडणूकांवेळी फक्त आश्वासनांची गाजरे लोकप्रतिनिधी देतात अशी संतप्त प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी दिली आहे. 

 कुणकेरी हे हुडा उत्सवासाठी प्रसिद्ध असणारे गाव. या गावातील बारा वाड्यांपैकी एक वाडी आजही विकासापासून दुर्लक्षित आहे. पाळणेकोंड धरणाच्या बरोबर खाली असणाऱ्या या वाडीवर आजही ये-जा करण्यासाठी पावसाळ्यामध्ये रस्ता उपलब्ध नाही. पाळणेकोंड धरण पूर्ण भरल्यावर त्याच्या सांडव्यातून विसर्ग होणारे पाणी या वाडीवर जाण्याच्या रस्त्याच्या मार्गामध्ये ओहोळाद्वारे येते. पावसाळ्यात या ओहोळाला कायम पाणी हे धोकादायक पातळीवर असल्याने वाडीचा गावाशी संपर्क तुटला जातो. अशावेळी कोणाची तब्येत जर खालावली तर त्याला वैद्यकीय सुविधा मिळणे खूप अवघड असते. तसेच तिला उचलून पाठीवरून पलीकडे आणावे लागते. सध्या वाढीतील 70% ग्रामस्थांचे वय हे 65 वर्षाच्या पलीकडे असल्याने त्यांना कायम डॉक्टर औषधोपचारावर अवलंबून राहावे लागते. अशावेळी पावसाळ्यात त्यांना अत्यावश्यक सुविधा मिळू शकत नसल्याने जीवन हे राम भरोसे झालेले आहे. आता हा पावसाळा देखील रस्त्याशिवाय पायपीट करून काढावा लागणार या विचारानेच येथील ज्येष्ठांच्या अंगावर शहारा उभा राहत आहेत.

विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या राजकीय नेत्यांची भाषणे ऐकल्यावर व कोटी कोटी रुपयाचा विकास निधी आणल्याच्या बढाया मारणारे लोकप्रतिनिधींना बघून असे वाटते की विकासाच्या या गप्पा फक्त कागदी घोडे नाचवण्यापुरत्याच का? प्रत्यक्षात मात्र ग्राउंड लेव्हल ला परिस्थिती वेगळीच अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे. कित्येक आंदोलनं करून निवेदन देऊन सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार मागणीकडे दुर्लक्ष करत असून लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांना काहीच वाटत नाही का ? निवडणूक आली की मतांचा जोगवा मागण्यासाठी ही मंडळी  मतदारांचे उंबरठे मात्र झिजवतात. बाकीवेळी मात्र पक्षा पक्षांमधील अंतर्गत कुरघोड्या  करण्यात व्यस्त असतात. सर्वसामान्यांच्या प्रश्नांबद्दल डोळ्यावर मात्र पट्टी बांधली जाते अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मागच्याच खासदारकीच्या निवडणुकीला वाडीतील ग्रामस्थांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या राजकारणाला  कंटाळून राजकारण्यांना वाडीवर  प्रचारबंदी केली होती. त्याची थोडी तरी लाज बाळगून राजकीय मंडळी आपला प्रश्न सोडवतील असे त्या नागरिकांना वाटले होते. परंतु, कसलीही लाज लज्जा नसणाऱ्या या लोकप्रतिनिधींना याचे कसलेही सोयर सुतक नाही. प्रत्येक निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये या पुलाचा उल्लेख केला जात असताना या कामाचे घोड अडते कुठे ? हा यक्षप्रश्न पडल्याचे  रहिवाशांचे म्हणणे आहे.