LIVE UPDATES

माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी नसबंदी परवानगी द्या

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: June 13, 2025 15:33 PM
views 125  views

सावंतवाडी : जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतीची होणारी नुकसानी लक्षात घेता सरकारनं तातडीन यावर उपाययोजना करण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत. यामध्ये प्रामुख्याने माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याबाबत सरकारनं निर्णय घेऊन तशी परवानगी वन खात्याला द्यावी, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याची माहिती माजी खासदार, ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी त्यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान उपाध्यक्ष प्रदीप सावंत, सचिव शांताराम रावराणे, कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे वरिष्ठ शास्त्रज्ञ बाळकृष्ण गावडे, डॉ. विलास सावंत, सुयश राणे, कर्मचारी अब्दुल शेख, दीपक सावंत, झीलू गांवकर आदी उपस्थित होते. श्री.सावंत पुढे म्हणाले, सध्यस्थितीत पावसाळी शेती हंगाम सुरू झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांसमोरील सर्वात मोठं संकट म्हणजे वन्य प्राण्यांचा उपद्रव आहे. गेले कित्येक वर्षे जिल्ह्यात हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या संदर्भात आज आपण उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याशी चर्चा केली. या संदर्भात नेमकी काय उपाययोजना करता येईल यासंदर्भात माहिती घेतली. यामध्ये माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असून त्यांना रोखणे कठिण बनल्याचे चर्चेदरम्यान समोर आले‌. माकडांना आळा घालण्यासाठी त्यांची नसबंदी हाच यावरील एकमेव उपाय असल्याचे उपवनसंरक्षक यांनी सांगितले. माकडांची नसबंदी करण्याबाबतची मागणी वन विभागाकडून शासनाकडे करण्यात आली आहे‌. परंतु, या संदर्भात अद्यापही परवानगी मिळाली नाही. त्यामुळे यामध्ये आपण लक्ष घातलं असून ही परवानगी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे‌. नसबंदीमुळे माकडांच्या पैदासीवर ताबा राहणार आहे. तसेच काही माकडांना पकडून त्यांना अन्य ठिकाणी सोडण्याची प्रक्रिया वनविभागाकडून राबविण्यात येत आहे. 

दरम्यान, गवा रेड्यांचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे‌. यासाठी सौरकुंपण हा उपाय असल्याचे उपवनसंरक्षक यांनी सांगितले. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमीनींची भौगोलिक स्थिती लक्षात घेता ती तुकडा पद्धतीची असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला सौरकुंपण बसविणे अशक्य आहे‌. यामुळे शासनाने जिल्हा परिषदच्या माध्यमातून ग्रामपंचायत पातळीवर सौरकुंपणासाठी निधी देऊन एकत्रित सर्व शेतजमिनींना संरक्षण द्यावे. असे केल्यास गवा रेड्यांच्या उपद्रवापासून शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो असं ते म्हणाले. तसेच दोडामार्ग येथील हत्ती प्रश्न देखील गंभीर बनला आहे‌. शेतकऱ्यांना केवळ नुकसानभरपाई देणे हा उपाय नसून कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे. याकरिता वनविभागाने प्रयत्न केले पाहिजे. या संदर्भात वनमंत्री व ग्रामविकास मंत्री यांची आपण भेट घेऊन तशा प्रकारची मागणी करणार आहे असही श्री. सावंत यांनी सांगितले. तसेच जिल्हा कृषी प्रतिष्ठानच्या माध्यमातून २५ हजार झाडाचं वृक्षारोपण जिल्ह्यात करण्याचा संकल्प आम्ही हाती घेतला आहे. यामध्ये ग्रामपंचायतीना समाविष्ट करून त्यांना झाड पुरविण्याचा आमचा मानस आहे. शक्य झाल्यास २५ हजार पेक्षा अधिक झाडांची लागवड केली जाणार असल्याचे ब्रिगेडीयर सावंत म्हणाले.