
सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हार्ट अटॅक आलेल्या मुंबई येथील नागरीकाचा जीव वाचवला. मुंबई विरार येथून संदीप विष्णू शिंत्रे (वय 55) ही व्यक्ती सावंतवाडी व माणगाव येथील दत्त मंदिरांना भेट देण्यासाठी आली होती. यावेळी हा प्रकार घडला.
काल रात्री १२ च्या दरम्यानं त्यांच्या छातीमध्ये दुखत असल्यामुळे एका व्यक्तीने त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. येथील डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले असता त्यांना हार्ट अटॅक आल्याचे सांगितले. यानंतर त्या पेशंटला लगेचच गोवा बांबुळी किंवा जिल्हा रुग्णालय ओरोस येथे दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र, पेशंटचे कोणीही नातेवाईक नसल्यामुळे पेशंटला जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याची जबाबदारी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी जबाबदारी स्वीकारली.
108 ला इमर्जन्सीसाठी असल्यानं व रूग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होतं. अशा वेळी सावंतवाडीच्या माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आपली ॲम्बुलन्स तातडीने उपलब्ध करून दिली. सावंतवाडी पोलीस स्टेशनचे बीट हवालदार पी. के कदम यांनी पेट्रोल खर्चासाठी पैसे दिले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे लक्ष्मण कदम व रवी जाधव यांनी स्वतः ॲम्बुलन्स घेऊन रात्री दीडला त्या पेशंटला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांकडून त्यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांचा जीव वाचवण्यात आला. ही घटना समजताच या पेशंटचे नातेवाईक मुंबईवरून रवाना झाले. दरम्यान, पेशंटचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. या बहुमूल्य सेवाभावी कार्यासाठी येथील डॉक्टर, सावंतवाडी पोलीस कर्मचारी पी.के कदम,अभिजीत कांबळे, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव लक्ष्मण कदम, व जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर यांचे पेशंटने आभार मानले.