
सावंतवाडी : सावंतवाडी शहराची नगरपरिषद एक सुंदर स्वच्छ कारभाराची नगरपरिषद म्हणून ओळख होती. मात्र, आज या नगरपरिषदेचा कारभार प्रशासक असणाऱ्या नवीन अधिकाऱ्यांच्या हातात गेला आहे. त्यामुळे नगरपरिषद हे भ्रष्टाचाराचे कुरण बनलं असून ते खाल्लंच पाहिजे अशा अविर्भावामध्ये नगरपरिषदेचा कारभार सुरू आहे असा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे.
ते म्हणाले, दोन महिन्यापूर्वी घाई गडबडीने केलेले रस्ते सगळेच्या सगळे उखडून गेलेत. मुख्य बाजारपेठेतील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. बुजवलेले खड्डे चार दिवस सुद्धा तग धरू शकले नाहीत. यामुळे अपघात होऊन त्यामध्ये अनेक लोक जखमी झालेत. शहरातील सर्व पाणंदी निसरड्या झाल्या असून अनेक लोक पडत आहेत. कुणाचं लक्ष याकडे नाही. सार्वजनिक शौचालयाची अवस्था भयानक आहे. चौकाचौकात रस्त्या रस्त्यावरती कचरा साठलेला आहे. सर्वत्र डासांची फैलाव झालेला आहे. मच्छी मार्केट अस्वच्छ, रस्त्याच्या साईड पट्ट्यात निसरड्या झाल्यात. सार्वजनिक स्ट्रीट लाईट बऱ्याच ठिकाणी बंद असून गार्डन स्मशानभूमी अस्वच्छता आहे. त्यामुळे यासह कामात झालेल्या
भ्रष्ट कारभाराचा जाब विचारण्यासाठी मुख्याधिकारी यांच्याकडे मंगळवारची वेळ मागितली असून प्रत्यक्ष भेट देऊन जाब विचारणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे.