सावंतवाडीत पाणीटंचाई नसल्याचा संजू परबांचा दावा

Edited by: विनायक गांवस
Published on: July 14, 2025 14:28 PM
views 113  views

सावंतवाडी : शहरात सध्या कोणतीही पाणीटंचाई नसल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केला आहे. शहरातील पाणीटंचाईबाबत ग्राहकांची कोणतीही तक्रार नगरपालिकेकडे आलेली नाही, त्यामुळे उगाच कोणी दिशाभूल करू नये असा सल्लाही त्यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना दिला.      

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शहरातील काही भागात पाणीटंचाई असल्याचा आरोप केला होता. या आरोपांचे खंडन करताना संजू परब यांनी पावसाळा सुरू झाल्यापासून शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे साळगावकर हे जनतेची दिशाभूल करत असल्याचा प्रतिआरोप परब यांनी केला. दरम्यान, शहरासमोरील अन्य महत्त्वपूर्ण समस्यांवरही परब यांनी लक्ष वेधले. शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले असतील तर  आपण स्वतः शहराची पाहणी करणार असून येत्या दोन दिवसांत शहरातील खड्डे बुजवण्यासाठी आपण नगरपालिकेला सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. असल्याचेही परब यांनी नमूद केले. उपजिल्हा रुग्णालयात नियुक्त करण्यात आलेले फिजिशियन लवकरात लवकर हजर व्हावे यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचेही परब यांनी आश्वासन दिले.

आरोग्य सेवेतील ही कमतरता दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची त्यांची भूमिका यावेळी स्पष्ट झाली. यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, नीता सावंत, नारायण उर्फ बबन राणे, अर्चित पोकळे, यशश्री सौदागर, क्लेटस फर्नांडिस यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.