...तर आक्रोश मोर्चा ; संजू परब यांचा इशारा

Edited by:
Published on: May 31, 2025 18:52 PM
views 125  views

सावंतवाडी : पंधरा दिवस आधीच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आणि बागायतदारांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे पाठवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी महसूल आणि कृषी विभागाला दिला आहे.

आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे हे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर सरकारकडे पाठपुरावा करून त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील मात्र पंचनाम्याअभावी कोणी शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले तर त्याला संपूर्णपणे अधिकारी जबाबदार राहतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बंटी पुरोहित, विनोद सावंत, प्रसन्न शिरोडकर आदी उपस्थित होते.

परब यांनी यासंदर्भात महसूल आणि कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मिरची व अन्य भाजी पीकं तसेच कोकम, जांभूळ तसेच आंबा व काजू अशा फळबागांचं नुकसान होऊनही तहसीलदार आणि कृषी विभागाने अद्याप पंचनामे केले नाहीत. शेतकऱ्यांपर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचली नाही, असं परब यांनी म्हटलं.     

तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी वाळू, खडी आणि चिरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात मग्न आहेत, पण शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे त्यांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. जर शेतकऱ्यांना नुकसानीपासून वंचित राहावं लागलं, तर तीव्र आक्रोश व्यक्त केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

संजू परब यांनी सांगितलं की, आमदार दीपक केसरकर यांनी तहसीलदारांना यासंदर्भात कठोर निर्देश दिले आहेत. शिवसेना नेते शेतकरी आणि बागायतदारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारकडे बाजू मांडतील. त्यामुळे तहसीलदार आणि कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून ते शासनाकडे पाठवणं गरजेचं आहे.

शेतकऱ्यांची मिरची, कोकम आणि इतर विविध फळांसह बागायतीचं मोठं नुकसान झालं आहे. मान्सूनपूर्व पाऊस पंधरा दिवस आधीच आल्याने हे नुकसान झालं आहे. जर या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे पाठवले गेले, तर नुकसान भरपाईबाबत निर्णय घेता येईल. मात्र, महसूल आणि कृषी विभाग पंचनाम्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. वेळीच पंचनामे झाले नाहीत, तर आक्रोश मोर्चा काढला जाईल, असा पुनरुच्चार परब यांनी केला. 

यावेळी संजू परब यांनी शिवसेना पक्षाच्या बळकटीकरणावरही भर दिला असल्याचे सांगितले. शिवसेना मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला जात असून, आमदार दीपक केसरकर सतत कार्यरत आहेत, असंही परब यांनी सांगितलं.

भूमिगत वीज वाहिन्या आणि रस्त्यांचा प्रश्न

दरम्यान, संजू परब यांनी सावंतवाडी शहरातील भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामावरून तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यावर टीका केली. आमदार दीपक केसरकर यांनी भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठी निधीही उपलब्ध झाला होता. मात्र, आठ वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यामुळे सावंतवाडी शहरातील लोकांना अंधारात राहावं लागल्याचं परब यांनी सांगितलं.

याव्यतिरिक्त, दाणोली ते बांदा रस्त्यावरील वाफोली रस्त्याला भेट देऊन पाहणी केली जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल, असंही त्यांनी नमूद केलं.