
बांदा : गरीब, गरजू विद्यार्थ्यांना दयासागर छात्रालयाचा खूप मोठा आधार आहे. समाजात वावरताना अशा विचारांचा नेहमी आदर केला पाहिजे. रोणापाल छात्रालयात शिस्तबद्ध वातावरण पहावयास मिळाले. त्यामुळे शिस्तीचे, संस्कारांचे माहेरघर म्हणजे दयासागर छात्रालय असल्याचे प्रतिपादन, सामाजिक कार्यकर्त्या संजना परब यांनी केले.
सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या पत्नी संजना परब यांनी वडील कै. शशिकांत राणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रोणापाल दयासागर छात्रालयास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी त्या बोलत होत्या. रोणापाल सरपंच योगिता केणी, माजी सरपंच सुरेश गावडे, मडुरा उपसरपंच बाळू गावडे, दयासागर छात्रालय प्रमुख जीबवा वीर, संजय बनकर, सरला पाटील, अनुप पाटील आदि उपस्थित होते.
दरम्यान, सामाजिक बांधिलकी जपत संजना संजू परब यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राबविलेला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी व्यक्त केले. जीवबा वीर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार सुरेश गावडे यांनी मानले.