
सावंतवाडी : तालुक्यातील जवळपास २० गावे वीज महावितरण कंपनीच्या वेंगुर्ले तालुका कार्यालयाशी जोडली गेल्याने स्थानिक ग्राहकांना प्रचंड मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. सध्या वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या घटनांमुळे ग्राहक त्रस्त असून, तक्रारींसाठी वेंगुर्ले येथील कार्यालयात जावे लागत असल्याने वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. तसेच स्थानिक ग्राहकाने तक्रार देण्यासाठी फोन केला तर उचलला जात नाही किंवा बंद लागतो. याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी वीज वितरण कंपनीला गाव जलदगतीने सावंतवाडी तालुका कार्यालयाशी जोडण्याची कृती करण्याची मागणी केली आहे. अन्यथा घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.
रुपेश राऊळ यांनी सांगितले की, सावंतवाडी आणि वेंगुर्ले हे दोन स्वतंत्र तालुके असतानाही वीज वितरण फिडरमुळे ही क्लिष्ट परिस्थिती निर्माण झाली आहे. मळेवाड, गुळूदुवे, तिरोडा, नानोस, किनळे, सातार्डा, साटेली, कवठणी, आरोस, दांडेली, तळवणे, सातोसे, आजगाव, भोमवाडी, धाकोरे, नेमळे यांसारखी सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावे गेली अनेक वर्षांपासून महावितरणच्या वेंगुर्ले झोनमध्ये समाविष्ट आहेत. यामुळे वीज ग्राहकांना आपल्या तक्रारी आणि अडचणी मांडण्यासाठी वेंगुर्ले येथे जावे लागते, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो. तसेच सावंतवाडी तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, कृषी कार्यालय, आरोग्य, बँक या सर्व कामांसाठी ग्रामस्थांची ये जा असते. त्यामुळे सावंतवाडी तालुका सर्व गोष्टीने सोईस्कर होणार हे लक्षात घेणे गरजेचे आहे. याबाबत स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने सावंतवाडी महावितरण कार्यालयाशी ही गावे संलग्न करण्याची मागणी केली जात आहे. परंतु, या मागणीकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रुपेश राऊळ यांनी केला आहे. विशेष म्हणजे, सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथे महावितरण कंपनीचे सब-स्टेशन आहे. हे सब-स्टेशन सावंतवाडी तालुक्यात असूनही त्याचे नियंत्रण दूरच्या वेंगुर्ले येथून केले जाते. रेडी, जे वेंगुर्ले तालुक्यात येते, तेथील फिडरमुळे हा गोंधळ आणखी वाढला आहे. गेल्या काही वर्षांपासून ही समस्या कायम असल्याने ग्राहकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याने महावितरण कंपनीला ग्राहकांच्या गैरसोयीची पर्वा नसल्याचे चित्र आहे, असे त्यांनी सांगितले. यापार्श्वभूमीवर, महावितरण कंपनीने सावंतवाडी तालुक्यातील सर्व गावांना तालुक्याच्या मुख्य कार्यालयाशी संलग्न करून वेंगुर्लेशी असलेले त्यांचे वीज वितरण कनेक्शन तोडण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. ग्राहकांना आपल्या समस्यांसाठी तालुक्याच्याच ठिकाणी सोय उपलब्ध करून देण्याची मागणी रुपेश राऊळ यांनी केली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांची ही गैरसोय तातडीने दूर करून, वेंगुर्लेशी जोडलेली ही 'नाळ' तोडून सावंतवाडीशी असलेले नाते वीज वितरण कंपनीने जोडावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन घेराव घातला जाईल, असा इशारा रुपेश राऊळ यांनी दिला आहे.