
सावंतवाडी : बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सावंतवाडी पोलिसांच्यावतीने शहरात मुख्य मार्गांवरून दिमाखात 'रूट मार्च' (संचलन) काढण्यात आला.
नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि सण-उत्सव शांततेत पार पडावेत, यासाठी पोलीस प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. संध्याकाळी १९:१५ ते १९:५५ या वेळेत हा रूट मार्च काढण्यात आला. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गार्डन येथून या संचलनाला सुरुवात झाली. त्यानंतर आर. पी. डी. हायस्कूल परिसर, सावंतवाडी नगरपालिका, गांधी चौक, परब नाका आणि चिटणीस नाका या मुख्य बाजारपेठेच्या आणि गजबजलेल्या मार्गांवरून फिरत हा रूट मार्च पुन्हा मूळ ठिकाणी येऊन समाप्त झाला. या रूट मार्चमध्ये सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, २ पोलीस उपनिरीक्षक आणि ४७ पोलीस अंमलदार असे एकूण ५० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.










