
सावंतवाडी : फॅशन म्हणून निवडणूक लढवू नका तर जनतेला त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी केले आहे
ते म्हणाले, निवडणुका जाहीर झाल्या की इच्छुक उमेदवार हळूहळू बाहेर पडू लागतात. जनतेशी गोड बोलून त्यांच्या हाता पाया पडू लागतात. परंतु, निवडून झाल्यानंतर मात्र काही नगरसेवक जनतेच्या समस्यांकडे पूर्णपणे पाठ फिरवतात ही वस्तुस्थिती आहे. कोरोना काळातील मागील पाच वर्ष विकासापासून वंचित राहिलेली आपली सुंदरवाडी पुन्हा सुंदर बनवण्यासाठी व येथील जनतेला त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी निवडून येणाऱ्या उमेदवारांनी एक नगरसेवक म्हणून नाही तर आपण या समाजाचं काहीतरी देणे लागतो ह्या भावनेने काम केल पाहिजे. तर तुमचं नगराध्यक्ष व नगरसेवक होणं एक सार्थकी ठरेल.
जनतेला तुमच्याकडून फार काही मोठ्या अपेक्षा नसतात. तर त्यांच्या काही किरकोळ अडचणी असतील त्याकडे लक्ष दिलात तर पुढच्या वेळी जनतेच्या दारात जाऊन मत मागण्याची कधीच वेळ येणार नाही. आज ज्यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांना शुभेच्छा आहेत. निवडून आल्यानंतर त्यांनी शहरातील सर्व प्रकारच्या मालमत्तेचं संरक्षण करून शहराच्या विकासाबरोबरच येथील जनतेला, व्यापाऱ्यांना त्रास न देता सर्वांगीण विकास करून येथील जनतेशी गुण्यागोविंदाने नांदता येईल याचा जास्त विचार करावा असे आवाहन त्यांनी केले.










