
सावंतवाडी : येथील दिव्यांग विकास केंद्राला कायमस्वरूपी व हक्काची जागा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे यांनी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्याकडे मागणी केली. यावेळी त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
गेली आठ वर्ष दिव्यांग केंद्र इकडून तिकडे स्थलांतर करीत होते. परंतू, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या प्रयत्नामुळे आता त्याला कायमस्वरूपी स्थिरता प्राप्त होणार आहे. सामाजिक बांधिलकीच्या रूपा मुद्राळेही दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या सोयी सुविधांसाठी सतत झटत असतात. प्रशासनाच्या कालावधीमध्ये रूपा मुद्राळे यांनी दिव्यांग मुलांचे होणारे हाल पाहून माजी नगरसेवक तानाजी वाडकर यांच्या प्रयत्नातून सावंतवाडी समाज मंदिर येथील शासकीय इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग मुलांच्या प्रशिक्षणासाठी एक खोली उपलब्ध करून दिली होती. परंतू, ही इमारत जीर्ण झाली असून स्लॅबमधून पावसाचं पाणी वर्गामध्ये पडत. या गोष्टीची दखल घेऊन रूपा मुद्राळे यांनी नगराध्यक्षांशी संपर्क साधला. त्यांनी दिव्यांग विकास केंद्राला भेट देऊन तेथील परिस्थितीची तसेच केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. दिव्यांग विकास केंद्रामार्फत दिव्यांग विद्यार्थी व लाभार्थ्यांसाठी शैक्षणिक, व्यावसायिक आणि पुनर्वसनाशी संबंधित विविध उपक्रम राबविले जात असल्याची अध्यक्षा रूपाली पाटील यांनी माहिती दिली. विशेष शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात असून डे-केअर सेंटरच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी एसएससीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्याची माहिती सुद्धा त्यावेळी देण्यात आली. दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या केंद्राचे कार्य महत्त्वपूर्ण असून, केंद्राला स्वतंत्र व हक्काची जागा मिळाल्यास अधिक प्रभावीपणे सेवा देता येईल, असे मत व्यक्त त्यांनी व्यक्त केले. तसेच दिव्यांगांसाठी शैक्षणिक, व्यावसायिक, वैद्यकीय, शासकीय योजनांचे मार्गदर्शन आणि विविध प्रशिक्षण उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविणे शक्य होईल, असेही ते पुढे म्हणाले.
यावेळी केंद्रामध्ये उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा यांच्याजवळ कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. याप्रसंगी नगरसेविका सुकन्या टोपले, नगरपरिषद अभियंता तुषार सर्डे व मनोज राऊळ उपस्थित होते . या मागणीबाबत सकारात्मक विचार करून आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आलं.याप्रसंगी विकास केंद्राच्या अध्यक्षा रूपाली पाटील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे, सचिव समीरा खलील, हेलन निब्रे , लक्ष्मण कदम, रवी जाधव तसेच केंद्राच्या अध्यक्षा रूपाली पाटील,सुनेत्रा खानोलकर शिक्षिका विधिशा राऊळ, द्रोपती राऊळ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.











