सावंतवाडी : गेली २२ वर्षे हत्तींच्या त्रासाला कंटाळून निवेदन देऊनही कुणी लक्ष देत नसल्याने दोडामार्ग तालुक्यातील हत्तीबाधीत गावांनी आज सावंतवाडी वनविभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढला. नुसती तोंडी आश्वासने नको, वनमंत्री, वरिष्ठांकडून लेखी पत्र द्या, अन्यथा अधिकार आमच्या ताब्यात द्या असा संतप्त पवित्रा घेत ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आम्हाला रोखण्यासाठी वापरलेलं पोलीस बळ हत्तींकडून शेतकऱ्यांच नुकसान रोखण्यासाठी लावा असं मत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केलं. तब्बल ६ तास भरपावसात आंदोलक, विरोधी पक्षाच्या नेत्यासह सत्ताधारी पक्षाचे नेते उपस्थित होते. वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी वरिष्ठांशी चर्चा करत शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम आहेत.