वेंगुर्ला किनारपट्टीवर पोलिसांचे 'कवच'

सागर सुरक्षा मोहिमेद्वारे सुरक्षेचा आढावा
Edited by: दिपेश परब
Published on: March 25, 2026 16:51 PM
views 18  views

वेंगुर्ले : कोकणच्‍या किनारपट्टीची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी आणि सागरी मार्गाने होणाऱ्या संशयास्पद हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दलाने कंबर कसली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी आणि सहकार्‍यांच्‍यावतीने वेंगुर्ला तालुक्यातील विस्तीर्ण सागरी किनारी भागात नुकतीच धडक 'सागर सुरक्षा मोहीम' राबवण्यात आली. "सागरी सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून ती आपल्या सर्वांची आहे. अशा मोहिमांमुळे पोलीस दल आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढतो आणि किनारपट्टी अधिक सुरक्षित होते.", असे तालुका पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी म्‍हणाले. 

अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा

या मोहिमेचे नेतृत्व वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी केले. या मोहिमेत केवळ स्थानिक पोलीसच नव्हे, तर जिल्ह्यातील ३ वरिष्ठ अधिकारी आणि २५ पोलीस अंमलदार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. समुद्रातून होणारे संभाव्य धोके ओळखून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम पार पडली.

पेट्रोलिंग व गस्त: वेंगुर्ला तालुक्यातील मुख्य बंदरे, खाडी परिसर आणि निर्जन किनाऱ्यांवर पायी तसेच बोटींच्या सहाय्याने गस्त घालण्यात आली.

मच्छिमारांशी संवाद: किनारपट्टीवरील सुरक्षेमध्ये 'सागर रक्षक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक मच्छिमारांशी पोलिसांनी संवाद साधला. समुद्रात कोणतीही अनोळखी नौका किंवा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले.

लँडिंग पॉईंट्सची तपासणी: सागरी सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या विविध लँडिंग पॉईंट्सची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

सुरक्षेचे 'अलर्ट' मिशन

गेल्या काही काळातील सागरी सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेता, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी पूर्ण जिल्ह्यासाठी विशेष सूचना दिल्या आहेत. याच सूचनेचे पालन करत वेंगुर्ला पोलिसांनी राबवलेल्या या मोहिमेमुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या मोहिमेदरम्यान विविध तांत्रिक बाबींचीही पडताळणी करण्यात आली.