कवयित्रींनी वाढविलेला कवितांचा पैस कौतुकास्पद : अंजली कुलकर्णी

सावंतवाडीतील निमंत्रितांचे विभागीय कवयित्री संमेलन
Edited by: ब्युरो
Published on: January 29, 2024 15:12 PM
views 173  views

सावंतवाडी : महाराष्ट्रातील कवयित्रींची काव्यलेखन परंपरा फार मोठी आहे. संत कवयित्रींनी ती समृद्ध केली आहे. तोच वारसा आजच्या कवयित्री समर्थपणे हाताळत आहेत. सन २००० नंतरच्या अलिकडच्या कवितेत बदल होताना दिसत आहे. केवळ स्त्रीविषय हाताळणारी कविता हा समज आजची कविता मोडताना दिसत आहे. आजच्या कवयित्री वेगळ्या धाटणीच्या सर्वस्पर्शी कविता विलक्षण ताकदीने लिहीत आहेत. त्यांनी आपल्या कवितांचा पैस वाढविला असून हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ कवयित्री-समीक्षक अंजली कुलकर्णी यांनी सावंतवाडी येथील विभागीय कवयित्री संमेलनात केले. 


आरती मासिक, श्रीराम वाचन मंदिर व कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  निमंत्रितांचे १७ वे विभागीय कवयित्री संमेलन श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात रविवारी संपन्न झाले. त्यावेळी पुणे येथील ज्येष्ठ कवयित्री-समीक्षक अंजली कुलकर्णी या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. 

गोव्यातील आघाडीच्या कवयित्री प्रा. अनुजा जोशी या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून लाभल्या होत्या. यांसह व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित होऊन संमेलनाचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर पुणे येथील प्रा. मृणालिनी कानिटकर, मुंबईतील उज्ज्वला लुकतुके, रत्नागिरीतील प्रा. जयश्री बर्वे,  गोव्यातील आसावरी कुलकर्णी व आयोजक प्रतिनिधी ज्येष्ठ साहित्यिक उषा परब उपस्थित होत्या.


प्रारंभी आयोजक प्रतिनिधी ज्येष्ठ साहित्यिक उषा परब, आरती मासिकाचे सहसंपादक भरत गावडे, श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कोमसापचे तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांच्या हस्ते सन्माननीय कवयित्रींचा गौरव करण्यात आला.

साहित्यिक उषा परब यांनी प्रास्ताविकातून 'आरती' मासिकाच्या माध्यमातून होत असलेले साहित्य क्षेत्रातील कार्य व संमेलन आयोजित करण्यामागचा उद्देश सांगितला. महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळण्यासाठी त्यांनी तशा प्रकारची जबाबदारी यशस्वीपणे पेलली पाहिजे. महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातून निमंत्रित कवयित्री साहित्याशी इमान राखण्यासाठी येत असल्याचे त्यांनी योवळी अधोरेखित केले. 

प्रारंभी प्रा. स्मिता परब यांनी उद्घाटक डॉ. अनुजा जोशी यांचा व प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी अध्यक्षा अंजली कुलकर्णी यांचा उपस्थितांना परिचय करून दिला. 

उद्घाटक डॉ. अनुजा जोशी म्हणाल्या, ''मराठी साहित्य विश्वातील स्त्रीचे प्रतिनिधित्व असणारे हे एकमेव कवयित्री संमेलन आहे. स्त्रीला दिशा मिळावी यासाठी सावंतवाडीत अविरतपणे संमेलन आयोजित होत आहे. स्त्रीच्या विचारांना चांगले व्यासपीठ देण्याचे मोठे कार्य आरती मासिकाने केले आहे. या संमेलनामागे साहित्यिक उषा परब यांची तपश्चर्या आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे.'' 

यावेळी आरती मासिकातर्फे घेण्यात आलेल्या काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रथम क्रमांक विजेत्या मनिषा पाटील यांच्या 'माणूस बी होऊन रुजला असता मातीत तर..' या कवितेचे वाचन आघाडीच्या कवयित्री सरिता पवार यांनी केले. द्वितीय क्रमांक विजेत्या मृण्मयी बांदेकर यांच्या 'अहिल्या' कवितेचे वाचन साहित्यिक उषा परब यांनी केले. त्यानंतर तृतीय क्रमांक विजेत्या मधुरा माणगावकर यांनी 'असेही जगावे', उत्तेजनार्थ राधा गाड यांनी 'आई जादूगार' व हेमा सावंत यांनी 'चंद्र तो नभातला' या कविता सादर करुन टाळ्यांची दाद मिळविली.

कवयित्री सरिता पवार यांनी स्त्रीचे पूर्वांपार विहिरीशी असलेले नाते आज कसे बदलत चालले आहे, हे उलगडून दाखविणारी भावस्पर्शी कविता 'विसर्जित होत जातेय विहीर..' सादर केली. ही कविता रसिकांच्या मनात झिरपत जाताना दिसून आली.

यावेळी डॉ. जी.ए.बुवा, आरती मासिकाचे संपादक प्रभाकर भागवत, आघाडीचे कवी दीपक पटेकर, दादा मडकईकर, मधुकर मातोंडकर, रमेश बोंद्रे, मनोहर परब, यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  

मेघना राऊळ यांनी या कार्यक्रमाचे सुरेख निवेदन करुन कार्यक्रमास रंगत आणली. त्यानंतर निमंत्रित कवयित्रींनी एकापेक्षा एक बहारदार काव्य सादर करून संमेलन वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. प्रज्ञा मातोंडकर यांनी खुमासदार शैलीत या काव्यमैफलीचे सूत्रसंचालन केले. सुरुवातीला निमंत्रित कवयित्री नंदा चव्हाण यांनी स्त्रीजीवनावर भाष्य करणारी 'तू चालत राहतेस..' ही कविता सादर केली. या कवितेस टाळ्यांची दाद मिळाली. गोव्यातून आलेल्या आसावरी कुलकर्णी यांनी सादर केलेल्या 'मला म्हणाला ऋतू एकदा ..' या काव्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. प्रीतम ओगले यांची 'पाऊस अवकाळीचा', शालिनी मोहोळ यांची 'आनंदाचे झाड' या कविता रसिकांच्या पसंतीस उतरल्या. मुंबईतील उज्ज्वला लुकतुके यांनी सादर केलेल्या सुरेल लघुरामायणाने वातावरणास भक्तीमयतेचा साज चढविला. सुरेल रामायण ऐकताना रसिक मंत्रमुग्ध झाले होते. डॉ. दिपाली काजरेकर यांची 'तुला पाहिले संसारात रमताना..' ही कविता व प्रा. हर्षवर्धिनी सरदार यांची 'पर्याय' या कवितांनी उपस्थितांना विचारउद्युक्त केले. रसिकांच्या मनाला या कविता भावल्या.

रत्नागिरीतील प्रा. जयश्री बर्वे यांनी तृतीयपंथीयांच्या वेदनेकडे संवेदनशीलतेने पाहणारी कविता सादर करून रसिकांना अंतर्मुख केले. त्यांची 'आशीर्वचन' ही कविताही उपस्थितांना भावली. अनुराधा आचरेकर यांच्या 'तुम्ही येतलास म्हणान..' या साधारण विडंबनात्मक कवितेने वातावरणात विनोदाचे रंग भरले. कल्पना बांदेकर यांनी 'रसाळ फणस' ही मालवणी वास्तववादी कविता सादर करून मने जिंकून घेतली.

पुण्याच्या प्रा. मृणालिनी कानिटकर यांनी शहरी जीवनातील स्त्रीच्या भावना मांडणारी 'त्याला आवडते म्हणून..' ही कविता सादर केली. त्यांनी 'सुंदर साजिरे आणिक गोजिरे' ही लयबद्ध कविता गाऊन दाखविली. या कवितेचे रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. प्रा. श्वेतल परब यांच्या 'हे पृथ्वीजा' या कवितेने रसिकांच्या मनाचा वेध घेतला. या कवितेने रसिकांना विचारउद्युक्त करुन टाळ्यांची पसंती मिळविली. 

वर्षाराणी अभ्यंकर यांनी 'सांग ना काय झाला गुन्हा ?' ही कविता लयबद्ध ठेक्यात गाऊन सादर केली. प्रा. अनुजा जोशी यांची 'साडी' ही कविता विशेष भावली. सर्वांच्या आग्रहास्तव साहित्यिक उषा परब यांनी सादर केलेली 'गुंता' ही कविता काव्यप्रेमींना आवडली. त्यानंतर संमेलनाच्या अध्यक्ष अंजली कुलकर्णी यांनी सादर केलेल्या 'किल्ला' व 'कविता लिहीणं' या कविता रसिकांची मने जिंकून गेल्या. 

यावेळी सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात आदर्शवत काम करणाऱ्या  'घे भरारी' फाऊंडेशनच्या सदस्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. फाऊंडेशनच्या मोहिनी मडगावकर व अन्य सदस्यांनी हा गौरव स्वीकारला.


या काव्यसंमेलनासाठी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहातील लावलेली भित्तीपत्रे उपस्थितांच्या कौतुकास पात्र ठरली.  या भित्तीपत्रांवर ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे, नीरजा, शांता शेळके, इंदिरा संत, अनुराधा पाटील यांच्या कवितांच्या ओळी होत्या.  सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी प्रशालेच्या विद्यार्थीनी आकांक्षा जाधव, सानिया घाडी व शिक्षक मिलिंद कासार, श्वेतल परब यांनी सुंदर सुवाच्च हस्ताक्षरात या कवितेच्या ओळी लिहिल्या होत्या.  

एकूणच, आयोजकांचे उत्तम नियोजन, मान्यवरांची उपस्थिती, रसिक-प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद व कवयित्रींच्या विविध रंगछटांनी भरलेल्या कवितांनी हे संमेलन उत्तरोत्तर बहारदार होत गेले.  समारोपावेळी प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.