परशुराम उपरकरांची मंत्री नितेश राणेंवर टीका

Edited by:
Published on: May 21, 2025 20:46 PM
views 35  views

सिंधुदुर्ग : नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या काही दिवसांत एलईडी आणि पर्ससीन मासेमारीवर कारवाईचा बडगा उगारला होता मात्र एलईडी फिशिंगला पूर्णतः बंदी असताना देखील  सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुलेआम एलईडी आणि पर्ससीन बोटींद्वारे मासेमारी सुरु आहे. त्यासंदर्भात  २० मे रोजी  नितेश राणेंनी मंत्रालयातील आपल्या दालनात मत्स्यआयुक्त व मस्त्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खुलेआम एलईडी, पर्ससीन फिशिंग सुरू असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नितेश राणेंनी स्वतःचा  ६ महिन्यातला अपयशी कारभार स्वतःच जनतेसमोर आणला आहे.  नितेश राणेंनी सुरुवातीला  एलईडी आणि पर्ससीनवर केलेली कारवाई परप्रांतीय मच्छिमारांकडून हप्ते वसूल करण्यासाठीच होती हे आता सिद्ध झाले आहे असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. 

एलईडी आणि पर्ससीन बोटींद्वारे केल्या जाणाऱ्या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छिमार मेटाकुटीस आले आहेत. मात्र नितेश राणेंनी त्यांना खुश करण्यासाठी पहिले काही दिवस  एलईडी आणि पर्ससीनवर कारवाई करत असल्याचे दाखवून दिले.त्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. आमचे साधे भोळे पारंपरिक मच्छीमारही या कारवाईमुळे खुश झाले परंतु नितेश राणेंची हि कारवाई औटघटकेची ठरली. हप्ते पोच करून एलईडी आणि पर्ससीन मच्छीमारांनी पुन्हा सिंधुदुर्ग किनारपट्टीवर हैदोस घालायला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड समुद्र किनाऱ्यांवर एलईडी आणि पर्ससीन बोटी  हैदोस घालत आहेत याची कबुली स्वतः नितेश राणेंनी आपल्या फेसबुक पोस्टमधून दिली आहे. त्यावर कारवाई होत नसल्याने नितेश राणेंनी आपण अपयशी मंत्री असल्याचे दाखवून दिले आहे. 

एलईडी आणि पर्ससीन बोटींद्वारे केल्या जाणाऱ्या मासेमारीमुळे गेले तीन महिने पारंपरिक मच्छिमार मस्त्य दुष्काळात आहेत.त्यांना सरकारकडून मदत करणे गरजेचे होते. मात्र त्याबाबत एक अवाक्षर देखील नितेश राणे काढत नाहीत.मत्स्य विभागाचे अधिकारी देखील एलईडी आणि पर्ससीन मच्छिमारांकडून हप्ते घेत आहेत. मंत्री आणि अधिकारी यांची सगळी मिली भगत असून पारंपरिक मच्छिमारांना यातून काही मिळणार नाही हे मात्र निश्चित आहे.आणि अशा परिस्थितीत मच्छिमारांना शेतकरी दर्जा असला तरी ५० टक्के पेक्षा कमी मच्छीमारी होऊन सुद्धा मच्छीमारांना कधीच मत्स्यदुष्काळ जाहीर होऊन त्याचा लाभ मिळणार नाही असा घणाघात माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.