LIVE UPDATES

वेताळ बांबर्डेत मुलांना शाळेत न पाठवण्याचा पालकांचा निर्णय

यशस्वी शिष्टाईनंतर शाळा नियमित सुरू
Edited by:
Published on: June 17, 2025 18:12 PM
views 250  views

कुडाळ : उन्हाळी सुट्टीनंतर आज दिनांक १६ जून रोजी सर्व शाळा नियमित सुरू झाल्या. परंतु आज शाळेच्या पहिल्याच दिवशी वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला. वेताळ बांबर्डे येथील कदमवाडी शाळेची झालेली दुरवस्था पाहून पालकांना हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे शाळेत आज मुलेच नसल्यामुळे शाळा नियमित सुरू झाली नव्हती.   परंतु शिवसेना नेते आनंद शिरवलकर आणि उपशिक्षणाधिकारी आंगणे यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर शाळा नियमित सुरू झाली. 

वेताळ बांबर्डे कदमवाडी शाळेच्या इमारतीची पार दुरावस्था झाली असून जागोजागी इमारतीच्या स्लॅबला तडे गेले आहेत. त्यामुळे पावसाच्या काळात हा स्लॅब नेहमी गळत असतो. परिणामी मुलांना पाण्यातच बसावे लागते. शिवाय स्लॅब कोसळण्याची भीती देखील पालकांच्या मनामध्ये होती. शाळेच्या खिडक्या गंजलेल्या स्थितीत असून त्या केव्हाही तुटून पडतील अशा अवस्थेत आहेत. याबाबत वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेमध्ये न पाठवण्याचा निर्णय घेतला.  

ही बाब शिवसेना नेते आनंद शिरवलकर यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी ताबडतोब उपशिक्षणाधिकारी आणणे यांच्यासहित वेताळ बांबर्डे कदमवाडी शाळेला भेट दिली. तसेच कदमवाडी येथील ग्रामस्थांच्या शाळेबाबत असलेल्या समस्या जाणून घेतल्या.  मी स्वतः आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या मागण्या पूर्ण करून  घेईन असे आश्वासन आनंद शिरवलकर यांनी ग्रामस्थांना दिले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून  ताबडतोब शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबत सूचना दिल्या.  तसेच उपशिक्षणाधिकारी आंगणे यांनी ही शाळा दत्तक घेतली असून शासन स्तरावर स्वतः पाठपुरावा करून शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करून घेईन असे सांगितले.  शिवसेना नेते आनंद शिरवलकर व उपशिक्षणाधिकारी आणणे यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर अखेर पालकांनी माघार घेत आपल्या पाल्यांना शाळेत पाठवले.

यानंतर सर्व मुलांनी शाळेमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रशालेच्या प्रवेशद्वारावर शिक्षकांनी मुलांचे औक्षण करत त्यांचे स्वागत केले. यानंतर मुलांना शिक्षणाची आणि शाळेची आवड व्हावी यासाठी मुलांना भेटवस्तू देत त्यांचे तोंड गोड करण्यात आले.  यानंतर आनंद शिरवलकर यांच्या शुभहस्ते शाळेच्या परिसरात रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सर्व पालकांनी शिवसेना नेते आनंद शिरवलकर व उपशिक्षणाधिकारी आंगणे यांचे आभार मानले.