कुडाळ : आज खऱ्या अर्थाने पूर्वीची शिवसेना एकत्र आली. आम्ही सर्वच जिल्हाप्रमुख म्हणून राहिलो आहोत. गट असतील तरी पुढील काळात सर्वांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवायची आहे. मी वनवासात होतो. आता परत आलो, कारण आम्हाला रामराज्य आणायचं आहे. अशा शब्दांत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
परशुराम उपरकर यांनी खासदार नारायण राणे आणि परिवारावर टीका केलीय. आम्ही वाडीवाडीत फिरत होतो, लोकांना भेटत होतो म्हणून नारायण राणे आमदार झाले, मुख्यमंत्री झाले. आज सर्व प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर आहेत. आपण खासदार, मुलं आमदार आणि उद्या नातू आमदार म्हणून येतील. मग कार्यकर्ते काय फक्त झेंडे लावणार का ? असा सवालही त्यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणालेत, दहशतीला भीक घालायची नाही. मी तुमच्या सोबत आहे. जे काय करायचं ते करा मी पुढे असेन. असा धीरही दिला.
तांदूळ फेकणाऱ्या मंत्र्यांना अजिबात थारा नको, आता पर्यंत त्यांनी खूप आश्वसन दिली, अशा शब्दात मंत्री दीपक केसरकरांवर टीका केली. मी कोणतीही निवडणूक लढवत नाहीय. त्यामुळे 24×7 कधीही बोलवा मी आहे. आज साठ वर्षाचा झालो तरी अंगात तीच खुमखूमी आहे. असाही ते म्हणालेत.