
सिंधुदुर्गनगरी : मृगनक्षत्राच्या मुहूर्तावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरूवारी रात्रीपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली.या वेळच्या अक्षरशः भाजून काढणाऱ्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला असून,जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातपेरणीला पारंपारिक व यांत्रिक पध्दतीने सुरुवात केली आहे. जिल्ह्यात खरे म्हणजे बैलांच्या साहाय्याने नागरणी करून भात पेरणी केली जाई.मात्र आता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सिंधुदुर्गात सुरू झाला असून, आता यंत्र सामुग्रीच्या माध्यमातून ट्रॅक्टरने सदर शेती नांगरून भात पेरणी केली जात आहे.जिल्ह्यात ठीक ठिकाणी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती नांगरताना व भात पेरणी करताना बळीराजा दिसू लागला आहे. नांगरणी तसेच भात पेरणीत शेतकरी बळीराजा सध्या व्यस्त असल्याचे कोकणात सर्वत्र पहावयास मिलुलागले आहे.
जिल्ह्यासाठी आवशक भात बियाणी व खत उपलब्ध सिंधुदुर्ग जिल्ह्याला आवश्यक असलेले भात बियाणे व खत उपलब्ध झाले असून त्याचा पुरवठा शेतकऱ्यांना सुरू झाला आहे.जिल्हा परिषद कृषि विभागामार्फत खरीप हंगाम -२०२४ साठी आतापर्यंत एकूण ४२०६ क्विंटल भात बियाणी प्राप्त झाली आहेत तर ४१८१ मेट्रिक टन एवढ्या खताचा पुरवठा झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खरीप हंगाम २०२४ साठी एकूण ९४६१ क्विंटल भात बियाण्याची गरज असून त्यापैकी आतापर्यंत महाबिज कडून ४५० क्विंटल , कृषि विद्यापीठ कडून ९२० क्विंटल, तर खाजगी कंपन्या कडून २८३६ क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे असे एकूण जिल्ह्यासाठी ४२०६ क्विंटल बियाणी प्राप्त झाली आहेत तसेच जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या १२,७०० मेट्रिक टन खता पैकी आज पर्यंत ४१८१ में. टन ख़त उपलब्ध झाले असून त्यामध्ये यूरिया ५९०० पैकी १८९५ मे. टन, डी ए पी ५०० पैकी २०० मे. टन, एम ओ पी ३०० पैकी १४५ मे. टन, सिंगल सुपर फॉस्फेट १३०० पैकी ६२३ मे. टन, तर सुफला ४७०० पैकी १३१८ मे टन, ख़त प्राप्त झाले आहे. अश्या प्रकारे एकूण १२,७०० मे टन खता पैकी ४१८१ मे टन ख़त प्राप्त झाले आहे.
उर्वरित ख़त पुढील आठवड्यात उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हा कृषि विकास अधिकारी जानबा झगडे यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांनी भरघोस पिकासाठी सेंद्रिय (दर्जेदार) खतांचा वापर करावा. बोगस ख़त व भात बियाण्याच्या विक्री पासून सावध रहावे. कोणतीही तक्रार असल्यास जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत त्या ठिकाणी आपली तक्रार नोदवावी . जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथका मार्फत त्याची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल .असे आवाहन जिल्हा परीषद कृषि विकास अधिकारी जानबा झगडे यांनी केले आहे.