सिंधुदुर्ग : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांचे कट्टर समर्थक, फायरब्रॅण्ड नेते, विरोधीपक्षनेते जितेंद्र आव्हाड यांची सावंतवाडी संस्थान मराठा समाज हॉल कुडाळमध्ये सभा होत आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत.
यावेळी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब म्हणाल्या, शरद पवार आणि कोकणचं वेगळं नातं आहे. कोकणी माणसांवर त्यांनी केलेलं प्रेम कोकणी माणूस विसरू शकत नाही. म्हणूनच आज एकनिष्ठतेने कोकणातील लोक शरद पवार यांच्यासोबत आहे. त्यांच्यामागे ठामपणे उभा आहे. शेतकऱ्यांसाठी फलोत्पादन योजना कोकणात आणायचं काम शरद पवार यांनी केले. त्यामुळे कोकणचं अर्थकारण बदलून मनी ऑर्डर पद्धत बंद पडली. इथली माणसं कृतज्ञ आहेत. ती नेहमीच शरद पवारांसोबत राहिलं. २०१४ ला इथले नेते संघटना घेऊन बाहेर पडले. त्यानंतरही आमचे नेते डगमगले नाही. २०१८ ला माझ्यावर जबाबदारी शरद पवार यांनी दिली. त्यानंतर चांगले दिवस पक्षाला येताना दिसत आहेत. आमचा पक्ष, आमचं चिन्ह शरद पवार आहेत असं मत अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले. तर सावंतवाडी मतदारसंघात गेल्या १५ वर्षांत न झालेल्या विकासावर त्यांनी सडकून टीका केली. शरद पवार यांच्यासोबत नवी पिढी देखील आहे. राज्यातील राजकारण बिघडण्यामागे केंद्रातील अदृश्य हात आहे. या अदृश्य शक्तीला रोखण्यासाठी 'कोकणातील कार्यकर्तो शरद पवारांवांगडा आसा' असा निरोप शरद पवार यांना द्यावा असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांना अर्चना घारेंनी केलं.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, व्हिक्टर डांन्टस, प्रसाद रेगे, शेखर माने आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.