
सावंतवाडी : शहरातील एका फायनान्स कंपनीने लोकांची अक्षरशः पिळवणूक केली आहे. मोबाईल, टीव्ही त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तातडीने लोन देऊन लोकांचा प्रतिसाद मिळवत आता त्या कंपनीने लोकांची पिळवणूक सुरू केली आहे. वेळेवर हफ्ता भरूनही तो आमच्याकडे अपडेट झाला नाही. त्यामुळे आपण पेनल्टीसाठी पात्र आहात, त्यानंतर पैसे वेळेवर भरूनही ४५० रुपये पेनल्टी आकारली जाते. आणि त्या वसुलीसाठी काही नेमणूक केलेल्या रिकव्हरी एजंट हे लोकांच्या घरी जाऊन चूकीच्या भाषेत किंवा मोबाईलवर चूकीचे संभाषण करून लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे.
सदर बाबत काही तक्रारी आमच्या कानी आल्या असून वेळीच संबंधित कंपनी व सावंतवाडी शहरातील त्या मॅनेजरने उपयोजना करावी, जनतेला चांगल्या सोयी सुविधा द्याव्या व चाललेली पिळवणूक थांबवावी, असा इशारा मनसेचे माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला आहे. तसेच त्या ठिकाणी पेनल्टी चार्जेस किंवा चौकशीसाठी गेल्यानंतर चूकीच्या भाषेत उत्तरे दिली जातात. मग डीलरला भेटा, तुमचे कागदपत्रे कोणती राहिले आहेत का? हे चौकशी करा वगैरे. यात निव्वळ वेळ काढून ग्राहकांकडून पेनल्टी कशी वसूल करून कंपनीचा फायदा कसा केला जाईल, असा हेतू सदर कंपनीचा दिसत आहे. त्यासाठी वेळीच त्यांनी सदर गोष्टी थांबवाव्या व ग्राहकांना चांगल्या प्रकारे सहकार्य करावे, अन्यथा घेराव घालून चाललेल्या चुकीच्या कामाचा पर्दाफाश करू, असा इशारा मनसेचे माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला. त्यानंतर जे होईल त्यास सर्वस्वी सदर फायनान्स कंपनीच जबाबदार असल्याचेही सुभेदार यांनी म्हटले आहे.