
सिंधुदुर्गनगरी : मालवण तालुक्यातील गुरामवाड येथील रोहिणी गुराम हिचा, तिचा राहत्या घरी खुन होऊन ४ महीने उलटले तरी अद्याप पोलिसांना खुनी सापडलेला नाही. यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी येत्या १५ दिवसात २ एप्रिल पर्यंत खून्याला अटक न झाल्यास कट्टा पोलीस ठाण्या समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा गुरामवाडी ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
मालवण तालुक्यातील गुरमवाडी ग्रामस्थ बाळ महाभोज, सुनील गुरव, शेखर पेनकर, अरुण गुरव, स्मिता गुराम, यांनी आज जिल्हा पोलिस अधिक्षक मोहन दहिकर याना निवेदन देऊन रोहिणी गुराम यांच्या झालेल्या खूना बाबत त्यांचे लक्ष वेधले . यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , गुरामवाड येथील रोहिणी रमेश गुरव वय वर्ष ६५ हिचा १० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी दहाच्या सुमारास राहत्या घरी एका अज्ञात व्यक्तीने खून केला. सदर रोहिणी ही सकाळी काराणेवाडी शाळेत मुलांना पोषण आहार देण्यासाठी गेली होती. परंतु त्यापूर्वी चोरीच्या उद्देशाने किंवा तिचा खून करण्याच्या उद्देशाने कोणीतरी एक अज्ञात व्यक्ती तिच्या घरी ती येण्या अगोदरच तिच्या घराच्या मागच्या बाजूने कौले काढून घरात शिरला होता. ती घरात आल्यावर त्या व्यक्तीला पाहिले असता तिने ओरड मारली. यावेळी त्या व्यक्तीने तिचा खून करून तिथून पळून गेला. या घटनेनंतर गावातील सर्व मंडळी जमा झाली व सदरील घटना पोलिसांना कळविण्यात आली असता जिल्हा पोलीस उपअधीक्षक यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी हजर झाले. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. परंतु या घटनेला ४ महिने उलटून झाले तरी अद्याप खुनी सापडलेला नाही. त्यामुळे गुरामवाडीतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत कट्टा पोलिसांना विचारले असता फक्त तपास चालू आहे असे उत्तर दिले जात आहे. कट्टा पंचक्रोशीत यापूर्वी कधीही अशा प्रकारचे खून, चोरी असे प्रकार घडलेले नाहीत. त्यामुळे या घटनेचा सखोल तपास करावा. व संबंधित खुन्याला तात्काळ अटक करावी . येत्या पंधरा दिवसात २ एप्रिल पर्यंत खुन्याचा तपास न लागल्यास कट्टा पोलीस ठाण्यासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे










