शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खतांचा पुरेसा साठा आणि तातडीची मदत द्या

पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचना
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 15, 2026 19:34 PM
views 26  views

सिंधुदुर्गनगरी : खरीप हंगाम जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन, दर्जेदार बियाणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कृषी विभागाने गावागावांत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा तसेच आधुनिक शेती पद्धतींची माहिती देण्यावर भर द्यावा. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने सज्ज राहून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. 

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृष्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री राणे म्हणाले की, जिल्ह्यातील प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकऱ्यांची माहिती संकलित करुन त्याव्दारे जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करावी. आपल्या जिल्ह्यात  रबर, ॲवाक्वाडो, अननस, स्ट्रॉबेरी, बांबु अशा नवीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा नाविन्यपूर्ण पिकांची लागवड होण्यासाठी प्रयत्न करावेत. वातावरणातील बदल शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावा. बोगस खते, औषधे आणि बि-बियाणांवर आळा घालण्यासाठी भरारी पथके अधिक प्रभावीपणे कार्यरत करावेत. खतांचा मुबलक साठा उपलब्ध करावा. जिल्ह्यात शेती कार्यशाळा मोठ्या प्रमाणात घ्याव्यात म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होईल. पी.एम. किसान सन्मान निधीच्या पात्र लाभार्थी वाढवावेत. आंबा-काजू पिकांचे पंचनामे २० मे पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. 

पालकमंत्री पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी खरीप हंगामातील मोहिमाव्दारे कृषी योजना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व स्तरावरून  प्रचार व प्रसिध्दी करावी. शेतीमुळे जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होणार असल्याने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.  बैठकीत कृषी विभाग, महसूल विभाग, सहकार विभाग, बँका, कृषी निविष्ठा विक्रेते तसेच संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी खरीप हंगामासाठी केलेल्या तयारीचा श्रीमती नाईकनवरे यांनी सविस्तर आढावा सादर केला. यावेळी पालकमंत्री राणे यांनी शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत खत, बियाणे आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीच्या सुरूवातीला एल निनो संदर्भात शास्त्रज्ञ डॉ. यशवंत मुठाळ यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी एल निनोच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, कशा प्रकारे नियोजन करावे याबाबत शास्त्रीय पध्दतीने माहिती दिली.