कळसुलीतील पाच वाड्यांना पाण्याचा पुरवठा व्हावा

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे विद्याधर दळवींची मागणी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 06, 2025 19:05 PM
views 249  views

कणकवली :  देंदोनेवाडी पाटबंधारे पाणी प्रकल्पाच्या पाण्यापासून कळसुली गावातील काही वाड्यांतील वंचित आहेत. उन्हाळात या वाड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. ही पाणी टंचाई दूर होण्यासाठी देंदोनेवाडी पाटबंधारे प्रकल्पातून पाण्याच्या पुरवठा होण्यासाठी कॅनाॅल किंवा पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे कळसुली-भोगनाथवाडी रहिवासी संघ, मुंबईचे कार्याध्यक्ष विद्याधर दळवी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, देंदोनेवाडी पाटबंधारे पाणी प्रकल्पातील पाण्यापासून कळसुली भोगनाथवाडी, गांगोसकलवाडी, बौद्धवाडी, परबवाडी, सुद्रिकवाडी वाड्या पाण्यापासून वंचित आहेत. उन्हाळी हंगामात वाड्यांमध्ये पाणी टंचाई झळ बसत आहे. कळसुलीमध्ये पाणी प्रकल्प असून त्याचा फायदा या वाड्यांना होत नाही. एप्रिल मे महिन्यात विहिरी पूर्णपणे सुकून जातात. त्यामुळे पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे आपण यावर लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी दळवी यांनी केली आहे.