
कणकवली : ग्रामीण भागामध्ये शेवटच्या टोकावर राहणार्या नागरिकाला सर्व प्रकारच्या सोयी - सुविधा मिळाव्यात, कामांसाठी शासकीय कर्यालयाकडे सारखे - सारखे हेलपाटे मारावे लागू नयेत, कमी वेळेत काम व्हावे तसेच आधुनिकतेकडे जाणारे जग थेट आपल्या गावाकडे असे आणता येईल, या दृष्टीकोनातून ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र हा उपक्रम नागरिकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविणारा आहे. ही सेवा राबविताना निश्चितच आव्हाने येतील. मात्र, गावचे सरपंच, लोकप्रतिनिधी, शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, यांनी इच्छाशक्ती व जिद्द दाखविल्यास या सेवेत कुठेही खंड पडणार नाही, असा विश्वास राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केला.
आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत स्तर) या जिल्हास्तरीय ऑनलाईन सेवेचा शुभारंभ शुक्रवारी कलमठ ग्रामपंचायत येथे मंत्री राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपिठावर जिल्हाधिकारी अनिल पाटील, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे, प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी सभापती तथा भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंचा स्वप्नील चिंदरकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री राणे म्हणाले, गतिमान सरकार आणि छ. शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य असे असावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आहे. या सरकारने पहिल्या १५० दिवसांमध्ये लोकभिमुख काम व पारदर्शकतेच्या दिशेने पाऊ ले उचलली आहेत. एआय सिंधुदुर्ग किंवा एआय महाराष्ट्र असो, त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन आम्ही सर्वानाच करत आहोत. त्यानुसार कलमठ गावाने उचललेले पाऊल कौतुकास्पद असून गावचे सरपंच संदीप मेस्त्री, उपसरंच स्वप्नील चिंदरकर यांच्यासह सर्व ग्रा. पं. सदस्य, अधिकारी यांचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने मी अभिनंदन करतो.
राणे पुढे म्हणाले, एआय सिंधुदुर्ग, एआय महाराष्ट्र ही चळवळ असून त्याचा सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. कारण, ग्रामपंचायतींमध्ये दाखले मिळणार असल्याने नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचणार आहे. साहजिकच जिल्ह्यातील नागरिकांच्या दरडोई उत्पन्न वाढीमध्ये हातभार लागणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना सरकारकडून दाखल्यांबाबात अनेक अपेक्षा असतात. शासकीय कार्यालयातील काम महिनोंमहिने होत नाही, अशीही नागरिकांची तक्रार असते. त्यावरच मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'एआय'च्या माध्यमातून रामबाण उपाय काढला आहे. फड़णवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य देशातील एआयचे केंद्रबिंदू असेल या दृष्टीकोनातून पाऊले उचलायला सुरुवात केली. साहजिकच या सेवेचा जिल्ह्यात होत असलेला शुभारंभ हा सर्व नागरिकांच्या आयुष्यात परिवर्तन घडविणारा आहे.
ही सेवा राबविताना आव्हाने निश्चितच येतील. सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर एआयचा प्रयोग कधी झालेला नाही. पण, त्या त्या खातेप्रमुखाने, सरपंचांनी इच्छाशक्ती आणि जिद्द दाखविल्यास या सेवेत कुठेही खंड पडणार नाही. तर कुठलीही आव्हाने आली तरी सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला 'एआय' जिल्हा बनवायचा, ही जिद्द स्विकारून आम्ही कार्यरत आहोत. आज येथे दाखले स्विकारणाऱ्या सर्व नागरिकांच्या चेहऱ्यांवर आनंद आहे. कारण, त्यांना कमी वेळेत, प्रवासखर्च वाचून दाखले उपलब्ध झाले. अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी पदाचा वापर नागरिकांच्या आयुष्यात परिवर्तन आणण्यामध्ये केला तर नागरिकही त्याची जाणिव ठेवतील, असेही राणे म्हणाले.
आज सुरुवात असून आपणाला फार मोठा टप्पा गाठायचा आहे. पूर्ण जिल्ह्यात आपण 'एआय'च्या माध्यातून फरक आणू शकलो तर जिल्हा नक्कीच गतिमान होईल. कलमठसारख्या शहरीकरण असलेल्या गावात आव्हाने कमी आहेत. पण, अन्य ग्रामीण भागामध्ये नेटवर्क व इतर समस्या आहेत, तेथे काय यंत्रणा लावायची, याचीही अधिकाऱ्यांनी तयारी करावी. नागरिक कौतुक करतील, तेव्हाच ही सेवा यशस्वी झाली, असे म्हणता येईल, असेही राणे म्हणाले.
अनिल पाटील म्हणाले, आपले सरकार सेवा केंद्र उपक्रम सेवा जिल्ह्यातील ३२९ ग्रामपंचायतीमध्ये सुरु होत आहे, ही लक्षणीय बाब आहे. या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचत आहोत. जनतेनेही या सेवांचा लाभा घ्यावा. तर ही सेवा अविरत सुरु रहावी, यासाठी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी मेहनत घ्यावी, असे आवाहनही पाटील यांनी केले. माणिक दिवे म्हणाले, आपले सरकार सेवा केंद्र उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये ३२९ प्रकारच्या सेवा उपलब्ध होणार आहे. या उपक्रमासाठी मंत्री नीतेश राणे यांचे वेळोवेळी योग्य सहकार्य लाभले. जिल्हाभर ही सेवा यशस्वी करून दाखवू, असा विश्वास दिवे यांनी व्यक्त केला. यावेळी अनेक ग्रामस्थांना दाखल्यांचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांनी तर आभार सरपंच संदीप मेस्त्री यांनी मानले.