नवीन कुर्ली ग्रा. पं. कार्यालय हे पक्षीय की शासकीय : अनंत पिळणकर

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 31, 2023 20:14 PM
views 61  views

कणकवली :  नवीन कुर्ली ग्रामपंचायत कार्यालय पक्षीय आहे की शासकीय ? असा सवाल करत शासकीय ग्रामपंचायत कार्यलयाचे उदघाटन प्रोटोकॉल न पाळता शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्याकडून करण्यात आल्याचा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी घेतला. जिल्हा परिषद शाळेच्या इमारती मधील खोलीत हे उदघाटन पक्षीय कार्यक्रम असल्याप्रमाणे करण्यात आले आहे त्यामुळे संबंधित मुख्याध्यापकावर प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी अनंत पिळणकर यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हा परिषद मुख्याधिकारी प्रजित नायर यांची भेट घेत निवेदनाद्वारे आज केली आहे. स्वतः माजी जि प सदस्य असलेल्या आणि पत्नी फोंडाघाट सरपंच असलेल्या संजय आग्रे यांनी केवळ राजकीय श्रेयवाद घेण्याच्या घाईत आपले अज्ञान प्रकट केल्याची टीकाही पिळणकर यांनी केली.स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी यासाठी आम्हीही शासनदरबारी पाठपुरावा केला. 

गावामध्ये गटातटाच्या राजकारणामध्ये काही गट राजकीय पक्षाच्या अजेंड्याखाली गावामध्ये कुणालाही कुठल्याही प्रकारे न कळवता ,न दवंडी देता, स्वतंत्र गटाच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे यांनी काल 30 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने  सुट्टी जाहीर असतानाही आपल्या पक्षाच्या मोजक्या कार्यकर्त्याना घेऊन नवीन कुर्ली येथे जिल्हा परिषद शाळेच्या एका रुम मध्ये नवीन कुर्ली ग्रामपंचायत कार्यालयाचे उदघाटन केले. यापुढे या ठिकाणाहून कुर्ली ग्रामपंचायत विषयासंदर्भात सगळ्या कारभार ,व व्यवस्था ,कुर्ली ग्रामस्थांना आजपासून मिळतील आशा आशयाची इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बातमी आम्ही वाचली व गावातील काही लोकांच्याकडून ऐकीवात आले.गावात गट तट सर्वत्र असतात परंतु गेले अनेक वर्षे या ग्रामपंचायतीच्या प्रस्तावा संदर्भात नवीन कुर्ली विकास समितीचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः १४  वर्ष यथोचित पाठपुरावा केलेला आहे.आपल्या स्तरावर ,जिल्ह्याधिकारी स्तरावर,कोकण आयुक्त ,मंत्रालय, संबंधित ग्रामविकास मंत्री आशा अनेक लोकांना भेटून ग्रामपंचायत होण्यासाठी प्रयत्न केले परंतु गावातल्या गटा तटाच्या राजकारणात गावातील बर्याचश्या लोकांना विश्वासात न घेता दवंडी न पिटता लोकांना नोटीस न देता ,ग्रामसभा न घेता, थेट ग्रामपंचायत कार्यालयाचे उदघाटन ते सुद्धा प्राथमिक शाळेत करण्यात आले.तब्बल ३२वर्षानंतर या गावाला ग्रामपंचायत मिळत असते वेळी एका कोणी पक्ष्याच्या कार्यकर्त्यांनी येऊन कोणालाही माहिती न देता आशा प्रकारच्या गोष्टी करणे गावातील लोकांना मान्य नाही. जिल्हा परिषद शाळेच्या एका रूममध्ये   ग्रामपंचायत कार्यालय उदघाटन झाल्यामुळे  शाळेच्या मुख्याध्यापकांवर सुद्धा कारवाई होणे गरजेचे आहे .कारण सुट्टी असताना देखिल त्या शाळेच्या एका वर्गामध्ये कोणी एका विशिष्ट पक्षाच्या लोकांच्या माध्यमातून असं ग्रामपंचायत म्हणून उदघाटन कसं  केलं जाऊ शकते ? हा गावातील बहुतांश लोकांवर झालेला अन्याय आहे.याविषयी जेजे जबाबदार असतील त्यांच्यावर आपल्या स्तरातून कारवाई होणे उचित आहे.आपण याबाबत  चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन केली आहे.