सावंतवाडी टर्मिनससाठी नारायण राणेंचं रेल्वे मंत्र्यांना पत्र

अमृत भारत स्थानक योजनेत समावेश करण्याची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: March 06, 2025 10:51 AM
views 458  views

सावंतवाडी : सावंतवाडी टर्मिनसचा समावेश अमृत भारत स्थानक योजनेत करा अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. रेल्वे मंत्र्यांना या मागणीच पत्र श्री. राणे यांनी दिलं आहे‌. याबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीने खासदार श्री. राणेंचे आभार मानले आहेत. 

या निवेदनात खास. राणे यांनी म्हटले आहे की, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी कडून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत कोकण रेल्वेवरील सावंतवाडी स्टेशन-टर्मिनसचा विकास करण्याची विनंती केली आहे. सावंतवाडी हे हजारो लोक विशेषतः उत्सवाच्या काळात वापरणारे एक महत्त्वाचे स्थानक आहे. सावंतवाडीचा विकास कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी सर्वात उपयुक्त ठरेल. त्यामुळे या प्रकरणात वैयक्तिकरित्या लक्ष घालून संबंधित संघटनेची विनंती स्वीकारण्याची, ती मान्य करण्याची सूचना द्या अशी मागणी खास. राणेंनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांच्याकडे केली आहे. याबाबत खास नारायण राणे यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून आभार मानले आहेत.