
सावंतवाडी : राणे कुटुंबीयांशी माझे जवळचे संबंध आहेत. माझी एन्जोप्लास्टी झाल्यानं पालकमंत्री नितेश राणे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते. आता मी ठणठणीत आहे. या भेटीवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासंदर्भात आमची चर्चा झाल्याची माहिती माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांनी दिली.
ते म्हणाले, पर्यटन, मच्छीमार, काजू, आंबा यासह कोकणी लोकांच्या भल्याविषयी आमची चर्चा झाली. काही लोकांना फक्त आमदार, खासदार व्हायचं असतं म्हणून ते बोलतात. आमचं तसं नाही, आम्हाला लोक आमच्या कामाच्या जीवावर निवडून देतात. आमचा उद्देश आमचा शेतकरी, बागायतदार, मच्छीमार समृद्ध होईल, महिला सुखी होतील यासाठी प्रयत्न करणे हाच आहे. आज महाराष्ट्र दिन, सिंधुदुर्ग दिनाला आम्ही भेटलो. महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन यशवंतराव चव्हाण मुंबईत आले. मात्र, आजही काही लोक बेळगावात मराठी राज्यापासून वंचित आहे. आमचं मन कन्नड सक्तीवेळी जळत. हुतात्म्यांच्या त्यागामुळे महाराष्ट्र निर्माण झाला याची जाणीव आम्हाला आहे अस मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले.
दरम्यान, भाजप जिल्हाध्यक्ष यांना नाही तर युती धर्म न पाळणाऱ्या प्रत्येकाला माझं उत्तर होतं. माझे देवेंद्र फडणवीस यांच्याशी अतिशय चांगले संबंध आहेत. त्याकाळात शिवसेनेत गेलो नसतो तर मी भाजपातच असतो. मी भाजपात याव अस फडणवीसांना वाटत होतं. आजही मी भाजपातून लढावं असं काही भाजपच्या लोकांचं मत होतं. शिवसेनेतून लढतो म्हणून विरोध होता. ही युती स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे एकमेकांची मने दुखावली जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. मी कोणावर टिका केली नव्हती. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस आम्हाला कशी वागणूक देतात याचीही जाणीव ठेवली पाहिजे असा टोला लगावला. तसेच दोडामार्गमधील मदरशांसंदर्भात कडक कारवाई होईलच. अनधिकृत मदरसा चालू दिला जाऊ शकत नाही. याठिकाणच्या मुलांना रेग्यलर शिक्षण दिलं जातं नाही हे देखील निदर्शनास आले आहे असंही विधान त्यांनी केले. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीत येणाऱ्या भरती प्रक्रियेत फिजीशीयन मिळेल अशीही माहिती त्यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील फिजीशीयनी सरकारी रुग्णालयात सेवा द्यावी अशी विनंती केली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाबु कुडतरकर उपस्थित होते