सिंधुदुर्ग : महाराष्ट्र स्टुडंन्ट इनोवेशन चॅलेंज स्पर्धेचे जिल्हास्तरीय सादरीकरण मेट्रोपॉलिटीन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट कॉलेज सुकळवाड येथे संपन्न झालं. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र स्टुडन्ट इनोव्हेशन चॅलेंज यांच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांच्या नाविण्यपूर्ण संकल्पनांना मूर्तिमंत स्वरूप देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई यांच्या मार्फत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र स्टुडंन्ट इनोवेशन चॅलेंज स्पर्धे'चे जिल्हास्तरीय सादरीकरण जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग कार्यालयामार्फत मेट्रोपॉलिटीन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट कॉलेज सुकळवाड येथे आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत नवले हे होते. प्रमुख उपस्थितीत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग सहाय्यक आयुक्त गणेश चिमणकर, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक मयुरी परब, यंग प्रोफेशनल नितीन दवणे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हास्तरीय सादरीकरनाचे मुल्यमापन करण्यासाठी ज्युरी मेंबर म्हणून यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी सावंतवाडी प्राचार्य विजय जगताप, सहयोगी प्राध्यापक प्रशांत माळी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर एम आय टी एम कॉलेज भाग्यश्री वाळके, शासकीय तंत्रनिकेतन मालवण सहाय्यक प्राध्यापक योगेश महाडिक, टीएमटी हायस्कूल महाविद्यालय सावंतवाडीचे प्रसाद सावंत, श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी डिगसचे सौरभ ठाकूर, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचे प्रशांत केरवडेकर यांनी काम पाहिले.
या स्पर्धेकरिता एकूण 192 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ८० नवसंशोधक प्राथमिक फेरीसाठी निवडले गेले. प्राथमिक फेरी मधून १७ नवसंशोधकांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी १६ नवसंशोधकानी आपल्या संकल्पनांचे सादरीकरण केले. या सादरीकरणचे जुरी मेंबरकडून मूल्यमापन करण्यात आले असून त्यापैकी उत्कृष्ट १० नव संकल्पानाची निवड करण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी १ लक्ष रुपयाचे बीज भांडवल महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई याच्या मार्फत देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश चिमणकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनभाग्यश्री वाळके यांनी केले.