पालकमंत्र्यांच्या शब्दाला किंमत नाही ; नितेश राणेच ठरले सरस

मंत्री चव्हाण अजून किती लाड पुरवणार : अतुल रावराणे
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 07, 2024 15:29 PM
views 237  views

वैभववाडी : पालकमंत्र्यांनी आता तरी आमदार नितेश राणे यांचे लाड थांबवावेत. सलग तिनं वेळा इमारतीचे उद्घाटन रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. आ.राणेंच्या बालहट्टामुळेच हे सर्व होत आहे असा आरोप शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी करीत पालकमंत्री रविंद्र चव्हाण व आ.नितेश राणेंवर टीका केली आहे.

पंचायत समिती इमारतीचे उद्घाटन पुन्हा एकदा पुढे गेल्यानंतर श्री.रावराणे यांनी सत्ताधाऱ्यांवर शेलक्या भाषेत टिप्पणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पंचायत समितीचे उद्घाटन स्थानिक आमदारांच्या हट्टामुळेच रखडले आहे. तालुकावासीयांच्या जिव्हाळ्याचा हा विषय होता. गेली दहा वर्षे हा प्रश्न भिजत घोंगड्याप्रमाणे पडला आहे. आम्ही याबाबत आवाज उठविल्यानंतर पालकमंत्र्यांनी शिल्लक कामाला निधी दिला. त्याला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. यानंतर यांचं उद्या उद्घाटन होणार होतं. पालकमंत्री यांचा दौराही निश्चित झाला. यावरून पालकमंत्र्यांनी या मतदारसंघाच पालकत्व स्वीकारले असे वाटत होते. मात्र सायंकाळी हा कार्यक्रम रद्द झाल्याच कळले. हे सर्व स्थानिक आमदारांने केले आहे असा आरोप श्री रावराणे यांनी केला.

आता पालकमंत्र्यानी यांचे बालहट्ट बंद करावेत. येथील जनतेच्या हिताचा विचार करावा. अन्यथा आता आम्ही वाट पाहणार नाही. ज्येष्ठ  नागरीकांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करणार असल्याचेही रावराणे यांनी सांगितले.