महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे सिंधुदुर्गमध्ये पडसाद | मनसेकडुन निषेध

कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला मनसे आणि मराठी जनता तयार : राज ठाकरे
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 07, 2022 18:59 PM
views 170  views

कुडाळ : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेले अनेक वर्षे सुरु असुन मराठी भाषिकांवर कानडी अन्याय करत आहेत. आज महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगाववासिय मराठी भाषीकांना भेटण्यासही विरोध केला गेला आहे. तसेच आज महाराष्ट्र पासिंग गाड्या कन्नड वेदिके पक्षाच्या गुंडानी  कर्नाटकात फोडल्या. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळच्या गाड्या कर्नाटक सीमेपर्यंत जातात पुढे जात नाहीत.  


परंतु कर्नाटक शासनाच्या गाड्या बिनादिक्कत महाराष्ट्रात येत आहेत. याचा निषेध आज माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आला. महाराष्ट्रावर आणि मराठी भाषीकांनवर अन्याय होईल, तेव्हा तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना भक्कमपणे त्याचा विरोध करेल. हा फक्त निषेध व्यक्त केला आहे. परिस्थिती नाही सुधारल्यास कर्नाटक पासिंग गाड्या जिल्ह्यात फिरु देणार नाही, अस या वेळेस महाराष्ट्र सैनिकांनी सांगितल.



दरम्यान, राज ठाकरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की' मी मध्यंतरी बोललो तसं, महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तात्काळ थांबवा.


हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल कि त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं.

अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधेसोप नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावे.

मी पुन्हा सांगतो कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे. आज इथल्या अनेकांची कुलदेवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यातील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे संघर्ष न होण्यात आणि मैत्री टिकण्यातच सर्वांचं हित आहे.