कुडाळ : वाढत्या कडक उन्हाळ्यामुळे विद्यार्थीवर्गाची दमछाक होत आहे. शासनाच्या धोरणानुसार 15 जून 2023 पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू झाल्या परंतु अद्यापही प्रत्यक्षात पावसाला सुरुवात न झाल्याने अनेक शाळांमध्ये आणि गावांमध्ये प्रत्यक्ष भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
अनेक विद्यार्थ्यांना पायपीट करीत कडक उन्हातून शाळेत ये - जा करावी लागत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रासही जाणवत आहे. या परिस्थितीचा गंभीर परिणाम होण्यापूर्वी शिक्षण विभागाने आपल्या अधिकारात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याबाबत आदेश करण्यात याव्यात अशी मागणी शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर व सचिव समीर परब यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांच्याकडे केली आहे. तत्काळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सकाळ सत्रात भरावाव्यात अशी मागणी शिक्षक भारतीने केली आहे.