छत्रपतींची शौर्यगाथा धगधगत्या शब्दात डोळ्यांसमोर उभी राहणार

प्रसिद्ध शिवचरित्रकार डॉ शिवरत्न शेटे यांचं 11 जानेवारीला व्याख्यान
Edited by: विनायक गांवस
Published on: January 10, 2026 18:53 PM
views 101  views

सावंतवाडी : येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ९ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी ११ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात 'धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज....' या शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मरक्षक म्हणून केलेल्या महान कार्यातील अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी शौर्यगाथा धगधगत्या शब्दात मांडणार आहेत. 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य कर्तृत्वात शौर्य, आदर्श, धैर्य, तेज असे अनेक पैलू आहेत. एवढे मोठे कर्तृत्व एका जन्मात जगभराच्या इतिहासात फार कमी राजांना निर्माण करता आले. महाराजांच्या कर्तृत्वाच्या या सगळ्या पैलूंमध्ये "धर्मरक्षक" म्हणून त्यांनी केलेले कार्य उजळून दिसते.

शिवशाहीच्या अगोदर आपल्या प्रांतावर मुघल आणि आदिलशाहीचा प्रभाव होता. त्यामुळे मराठी माणसाला जगणे मुश्किल झाले होते. माणसं सोडा मंदिरातील देवही सुरक्षित नव्हते. तर दुसऱ्या बाजूने पोर्तुगीजांनीही डोके वर काढले होते. त्यामुळे केवळ धर्मच नाही तर इथली संस्कृती अडचणीत आली होती. पर्यायाने अत्याचाराने परिसिमा गाठली होती. नेमक्या याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने सह्याद्रीच्या रांगामधून सुरू झालेल्या भगव्या झंजावाताने संस्कृतीवर घाला घालणाऱ्या या प्रवृत्तींना सळो की पळो करून सोडले. अत्याचाराचा अस्त होऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. महाराजांनी केवळ हिंदू धर्म आणि संस्कृतीचे रक्षण केले नाही तर इतर धर्माचा आदर कसा करावा याचा आदर्श पूर्ण जगाला घालून दिला. यातूनच त्यांच्या कर्तृत्वाची उंची मोजायला आकाश ठेंगणे पडू लागले. त्यांची ही धर्मरक्षक शौर्यगाथा प्रत्येक स्वाभिमानी राष्ट्रभक्तास माहीत असायलाच हवी. या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे महाराजांनी धर्म रक्षक म्हणून बजावलेल्या शौर्याच्या पराक्रमाचा इतिहास सखोल समजून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने डॉ प्रविणकुमार ठाकरे व केदार बांदेकर यांनी केले आहे.

या प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापूर्वीच्या शिवजागरात रयतेचे राजे शिवराय आमुचे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, महाराजांची आग्र्याहून सुटका, नरवीर शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे, प्रतापगडाचा रणसंग्राम, छत्रपतींचा दक्षिण दिग्विजय, रणझुंजार ताराराणी साहेब अशी ८ पुष्पे सादर करण्यात आली. याला आबाल वृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे हे ९ वे पुष्पदेखील ऐतिहासिक राजवाड्यात सिंधुदुर्गवासीयांच्या गर्दीने बहरणार आहे.