LIVE UPDATES

'सुंदरवाडी मधाळ स्वप्नांचं गाव' पुस्तकाचे प्रकाशन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 27, 2026 21:29 PM
views 21  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील ज्येष्ठ लेखक बाळकृष्ण सखाराम राणे यांच्या 'सुंदरवाडी मधाळ स्वप्नांचं गाव' या ललितलेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते थाटात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेसाहेब खेमसावंत भोसले उपस्थित होते. 

तसेच प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुधाकर ठाकूर, कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर, निवृत्त प्रा. एम व्ही कुलकर्णी, प्रा.फातर्पेकर, प्रा.सुभाष गोवेकर, प्रा. गोडकर, जयप्रकाश सावंत, प्रा.शिंत्रे, निवृत्त पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस, लेखक बाळकृष्ण राणे, सौ.राणे, विनय सौदागर, सौ. संजना परब आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजक १९८२ सायन्स बॅचच्या वतीने हेमंत झांट्ये, ॲड गावकर, धरणे, सौ.सुखदा पेडणेकर, सौ.सुप्रिया गोडकर, सौ.अपर्णा झांट्ये, सौ गीता धरणे, सौ.शैलजा शिरोडकर, सौ.संपदा देसाई, सौ.ऋग्वेदिता देसाई यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक करताना प्रा.गोडकर यांनी केले.  पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. दीपक पटेकर यांनी बाळकृष्ण राणे हे कोमसाप सदस्य असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो, असे सांगताना ललित लेखन म्हणजे काय? यावर प्रकाश टाकला. ललित मधील सौंदर्यस्थळे, शृंगार याबद्दल सखोल माहिती दिली. बाळकृष्ण राणे यांच्या पुस्तकाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथी राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले यांनी राणेंच्या पुस्तकाचे कौतुक करून आपल्या कॉलेजमधील माजी विद्यार्थी अशाप्रकारे यश मिळवत असल्याचा आनंद व्यक्त केला. कॉलेजच्या रजिस्टरमध्ये अशा वेगवेगळ्या विभागात कार्यरत असलेल्या साहित्यिकांची नोंद घेतली जाईल असे सांगितले. डॉ सुधाकर ठाकूर यांनी प्रथम ललित या विषयावर मार्गदर्शन केले आणि राणे यांच्या पुस्तकातील सावंतवाडीसह सावंतवाडीतील व्यक्तिचित्रणे, स्थळ यांची दिलेली माहिती हा महत्त्वाचा दस्तऐवज असून त्याचे पुस्तकाच्या माध्यमातून संवर्धन, जपणूक झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. 

यावेळी प्रा. एम व्ही कुलकर्णी, प्रा. सुभाष गोवेकर, प्रा. फातर्पेकर यांनी देखील मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक विनय सौदागर यांनी केले तर आभार प्रदीप पेडणेकर यांनी मानले. यावेळी श्री गोठोस्कर, अभय पंडित, प्रा. मर्गज, म्हसकर सर, अण्णा देसाई, सावंतबिर्जे, सुनील कोरगावकर, आरिफा शेख, संतोष मुंज, सुधीर शिरोडकर, नंदकुमार देसाई, अरुण देसाई यांच्यासह १९८२ बॅचचे विद्यार्थी, सुंदरवाडी ग्रुपचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.शिंदे, प्रा. निकुम, प्रा. पाटील, प्रा. धुरी. प्रा. एस. व्हि.पाटील, प्रा. काळे यांनी मोलाची मदत केली.