वेंगुर्ला : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्यावतीने संविधानात्मक मार्गाने आंदोलन असताना पोलिसांनी जो त्यांच्यावर लाठीचार्ज केला तो अतिशय अमानुष व माणुसकीला काळिमा फासणारा आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीचा मी एक जाहीर निषेध करतो. अशी प्रतिक्रिया ठाकरे शिवसेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख तथा वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी सभापती यशवंत परब यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलिसांनी हा लाठीचार्ज केला. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्यावतीने आजपर्यंत अनेक विशाल मोर्चे शांततापूर्ण मार्गाने आयोजित करण्यात आले, समाजात दुही निर्माण होईल किंवा हिंसा होईल अशी घटना आजपर्यंत झाली नाही.
असे असताना मराठा समाजाला दडपण्यासाठी हजारो पोलिसांचा फौजफाटा घेऊन राज्य सरकारच्या आदेशाने हा लाठीचार्ज झाला आणि यात अनेक मराठा मावळे व महिला, वृद्ध जखमी झाले. घरात घुसून मराठा आंदोनकर्त्यांना मारण्यात आले. ही बाब निंदनीय असून समाजाला काळिमा फासणारी आहे. याचा जाहीर निषेध करतो. आणि या कृत्या विरोधात लवकरच वेंगुर्ला तालुक्यातील सर्व मराठा बांधव रस्त्यावर उतरतील अशी प्रतिक्रिया यशवंत परब यांनी दिली आहे.