
कुडाळ : मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत अभियान अंगर्गत आज पिंगुळी ग्राम पंचायतीच्या वतीने स्वच्छता रॅली काढण्यात आली. एका अर्थाने या रॅलीच्या माध्यमातून अभियानाची सुरुवात झाली असून या अभियानात पिंगुळी ग्राम पंचायत उल्लेखनीय कामगिरी बजावेल असा विश्वास सरपंच अजय आकरेकर यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत अभियानाला सुरुवात झाली आहे. त्या अभियान अंतर्गत सगळ्या ग्राम पंचायतीनी आपापल्या गावांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पिंगुळी ग्राम पंचायतीच्या वतीने स्वच्छता रॅली काढून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. वॉर्ड क्र. ३ च्या वतीने आकर्षक असा स्वच्छता रथ तयार करण्यात आला होता. त्या रथाच्याद्वारे हलत्या मॉडेल्सच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला होता. दोन मुलांनी डस्टबिनचे रूप घेऊन डस्टबिनचा उपयोग शिकवला. स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
पिंगुळी म्हापसेकर तिठा ते राऊळ महाराज मठ आणि पुढे श्री रवळनाथ मंदिर या मार्गावर हि रॅली काढण्यात आली. पिंगुळी जिल्हा परिषद गुढीपुर शाळा येथील विद्यार्थी, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेतील विद्यार्थी या रॅलीमध्ये विविध ऐतिहासिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
पिंगुळी ग्राम पंचायतने यापूर्वी देखील विविध विविध अभियानामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे या अभियानात देखील पिंगुळी ग्रा.प. ला बक्षीस मिळेल असा विश्वास सरपंच यांनी यावेळी व्यक्त केला. कुडाळचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर म्हणाले, पिंगुळीला राऊळ महाराज यांचं अध्यात्मिक आणि ठाकर लोककलेसारख्या पारंपरिक कलेचे अधिष्ठान लाभल आहे. या अभियानात देखील पिंगुळी ग्रामपंचायत आपली यशाची परंपरा कायम राखेल असे गट विकास अधीकारी श्री. वालावलकर म्हणाले.
यावेळी सरपंच अजय आकेरकर, उपसरपंच मंगेश मस्के, बीडीओ प्रफुल्ल वालावलकर, ग्राम विकास अधिकारी श्री. निवतकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रशांत धोंड, सागर रणसिंग, ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










