
वारकऱ्यांसाठी मोठी पर्वणी
वैभववाडी : नाधवडे येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भव्य असा एकादशी उत्सव साजरा होणार आहे. कोकणातील वारकऱ्यांसाठी प्रति पंढरपूरच याठिकाणी अवतरणार आहे. या महोत्सवाची तयारी ही सुरू झाली आहे.
वैभववाडी तालुक्यातील नाधवडे या गावी गेली तीन वर्षे येथील आषाढी एकादशी उत्सव समिती यांच्या माध्यमातून मुंबईकर व गावची मंडळी मिळून विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त एकादशी उत्सव साजरा केला. वारकरी दिंड्या , भजन, किर्तन यांसारख्या कार्यक्रमांनी हा उत्सव साजरा केला जातो. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा नयनरम्य सोहळा पार पडतो. याही वर्षी हा सोहळा संपन्न होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मुंबई व गावकरी मंडळी कामाला लागली आहे. यावर्षीही भव्य दिव्य असा सोहळा साजरा केला जाणार आहे. कोकणातील वारकरी मंडळींसाठी ही पर्वणीच असणार आहे.